सेमाडोह-परतवाड्यात वटवाघुळांच्या वसाहती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:12+5:30
जगात वटवाघळाच्या १ हजार १३ प्रजाती आहेत. भारतात १२३ आहेत. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक प्रजाती वटवाघळांच्या आहेत. यात २० टक्के वटवाघळे फलाहारी आहेत, ८० टक्के कीटकभक्षी आहेत. ८०० पेक्षा अधिक प्रजातीची वटवाघळे जंगलातील गुहेत राहतात. यातील ५० प्रजाती हॉर्स शूमधील आहेत. हॉर्स शू प्रजातीतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात. गुहेतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात.

सेमाडोह-परतवाड्यात वटवाघुळांच्या वसाहती
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोरोना विषाणूमुळे चर्चेत आलेल्या वटवाघळांच्या परतवाडा आणि सेमाडोह येथील वसाहती आता सर्वांच्या लक्ष वेधून घेत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वटवाघळांच्या वसाहती परतवाडा व सेमाहोड परिसरात अस्तित्वात आहेत. यात शेकडो वटवाघळे वड, पिंपळ, निलगिरीच्या झाडावर एकाच ठिकाणी समुहाने वर्षानुवर्षे राहत आहेत.
परतवाडानजीक अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात पिंपळाच्या व निलगिरीच्या झाडावर, तर मेळघाटातील सेमाडोह येथील वनविभागाचे कार्यालयासह स्टेट बँकलगतच्या वडाच्या झाडावर या वसाहती आहेत.
पंख असूनही पक्षी नसलेली ही उडणारी वटवाघळे काळ्या नि राखाडी रंगाची आहेत. झाडावर राहणारी ही वटवाघळे फलाहारी आहेत. त्यांना फ्लार्इंग फॉक्स म्हटले गेले आहे. ही फलाहारी, झाडांवर राहणारी वटवाघळे कोरोना पसरवित नाहीत.
जगात वटवाघळाच्या १ हजार १३ प्रजाती आहेत. भारतात १२३ आहेत. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक प्रजाती वटवाघळांच्या आहेत. यात २० टक्के वटवाघळे फलाहारी आहेत, ८० टक्के कीटकभक्षी आहेत. ८०० पेक्षा अधिक प्रजातीची वटवाघळे जंगलातील गुहेत राहतात. यातील ५० प्रजाती हॉर्स शूमधील आहेत. हॉर्स शू प्रजातीतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात. गुहेतील वटवाघळे शंभर टक्के घनदाट जंगलात राहतात. गुहेतील वटवाघळे कीटकभक्षी असतात. या कीटकभक्षी वटवाघळांमुळेच जगात कोरोना विषाणू पसरल्याची मान्यता आहे. शंभर टक्के घनदाट जंगलातील गुहेतील ही वटवाघळे १९ डिग्री तापमानाला गुहेत अंधाऱ्या जागेत लटकून राहतात. ही वटवाघळे तापमान वाढल की, जगू शकत नाहीत. भारतीय लोकांच्या आणि जंगलातील गुहा यांचा संबंध येत नाही, असे प्राणितज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
हजार वर्षांतून एकदाच संक्रमण
आजचा हा लॉकडाऊन आणि सध्याच्या साथीशी भारतीय वटवाघुळांतील विषाणूंचा संबंध नाही. हजार वर्षांतून एकदाच वटवाघळातून माणसात कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याचे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे जगभरात दीड लाख मृत्यू झाले आहेत.