कपाशीच्या बोगस बियाण्यांची अधिक दराने बाजारात विक्री ?
By Admin | Updated: June 21, 2014 23:47 IST2014-06-21T23:47:26+5:302014-06-21T23:47:26+5:30
मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे.

कपाशीच्या बोगस बियाण्यांची अधिक दराने बाजारात विक्री ?
वरुड : मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे. यातच तालुक्यात कपाशीच्या बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याने अशा बियाण्यांपासून सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. तणनाशकाची फवारणी करता येणाऱ्या कपाशीचे विशिष्ट तसेच नकली बियाण्यांची मागणी होत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातूून बियाणे विक्रीसाठी दलालसुद्धा सक्रिय झाल्याने स्थानिक कृषी विक्रेते ठप्प बसले असल्याचे दिसून येत आहे. ९०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत बियाणे बॅग विक्री सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांनी अप्रमाणित कपाशी बियाण्यांची लागवड केल्यास ते जमिनीतून बाहेर येतील की नाही याची खात्री नसल्याने याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याची शक्यता अधिक आहे.
उन्हाळयात शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली केली असून पेरणीसाठी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पेरणीपूर्व बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहे. जमिनीची मशागत पूर्ण होऊन पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्थिक अडचण आणि बँकांकडून अद्यापही पीककर्ज मिळाले नसल्याने अल्पभूधारक शेतकरी पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीकरिता पैशाच्या तडजोडीत लागला आहे. परंतु तणनाशकाच्या फवारणीच्या दृष्टीने कपाशीचे उत्पादन अधिक व्हावे म्हणून विशिष्ट जातीच्या कपाशीची बियाण्यांची मागणी वाढली. विशिष्ट बियाण्यांची विक्री करण्यात दलाल सक्रिय झाले आहेत. ९०० रुपये ते एक हजार रूपयापर्यंत विक्री सुरु असल्याची खमंग चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सदर बियाणे नरखेड, जलालखेडा, मध्यप्रेदशातील पांढुर्णा येथून आणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु विशिष्ट जातीच्या बियाण्यांची मागणी वाढली असली तरी सदर बियाणे प्रमाणित नसल्याने आणि प्रतवारी नसल्याने महागाईने त्रस्त झालेला शेतकरी आता मशागतीसाठी सुध्दा खर्च करु शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी अठराविश्वे दारिद्र्य येण्याची शक्यता आहे. नकली बियाण्यांमुळे कपाशी उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक दुकानात प्रमाणित बियाणे असून शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने कृषी दुकानदार ठप्प बसले आहे. नकली व अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीबाबत पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून अशा विक्रेत्याचा शोध सुरु असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)