कोविड रूग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे सात मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:58+5:302021-02-05T05:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : खुनाच्या गुन्ह्यात अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कोरोनाबाधित गुन्हेगाराने सुपर स्पेशालिटी कोविड रूग्णालयातून ...

कोविड रूग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे सात मोबाईल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खुनाच्या गुन्ह्यात अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कोरोनाबाधित गुन्हेगाराने सुपर स्पेशालिटी कोविड रूग्णालयातून गुरूवारी रात्री पलायन केल्यामुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर गाडगे नगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी कोविड रूग्णालयात जावून चौकशी केली असता, ११ कोरोनाबाधित आरोपी याठिकाणी उपचार घेत असून, त्यापैकी सातजणांकडील मोबाईल व चार्जर चोरमले यांनी जप्त केले.
यवतमाळ येथे भादंविचे (कलम ३०२) खुनाच्या गुन्ह्यात अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी सलमान शेख शेख अहमद (२६, रा. रहिम नगर, यवतमाळ) याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला कोविड रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरूवारी तो रूग्णालयातून पळून गेला. कोविड रूग्णालय प्रशासनाने ही माहिती गाडगे नगर पोलिसांना दिल्यानंतर आरोपीच्या मागावर पथक पाठविण्यात आले. मात्र, आरोपी पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे गाडगे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले हे पथकासह कोविड रुग्णालयामध्ये पोहोचले. त्यांनी येथे झडती घेतली असता, त्यांना येथे विविध गुन्ह्यातील ११ आरोपी कोरोनावरील उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे आरोपी पळून जावू नयेत किंवा बाहेरच्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होऊ नये, यासाठी सात आरोपींकडे असलेले मोबाईल व चार्जर पोलिसांनी तातडीने जप्त केले. तसेच कोविड रूग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, एक जमादार व चार शिपाई याठिकाणी तैनात करण्यात आल्याच माहिती ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.
बॉक्स:
डिस्चार्ज झाल्यानंतरही आरोपी रूग्णालयातच
कोरोनाबाधित असलेल्या ११ आरोपींची माहिती पोलिसांनी घेतली असता, अनेक आरोपींना येथील डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असला, तरीही काही आरोपी रूग्णालयातून बाहेर पडायला तयार नसल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. त्यामुळे संबधित यंत्रणेने अशा आरोपींचा डिस्जार्ज झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी ताब्यात घ्यावे, आरोपी पळून गेले तर ही जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.