लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शिरजगाव, मोझरी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून हे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे.
शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादनाच्या हमीवर यंदा एका विशिष्ट कंपनीच्या सोयाचीनची पेरणी केली. शेतकऱ्यांनी लॉट नं. ०००७८९ च्या सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. परंतु, हा लॉट नंबरच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच्या - आशेवर पाणी फेरले गेले असून, - दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता, त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरलेले अन्य कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेले दिसले. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी त्या विशिष्ट कंपनीचे सोयाबीन पेरले, त्यांच्या शेतात दाणाही उगवलेला दिसून आला नाही. या बियाण्याने जवळपास साठ हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाले असून, शेतकऱ्यांवर हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट कोसळले आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे विक्रेता व कंपनीचे एरिया मॅनेजर यांना शेतात बोलावून स्थिती दाखविली. तेव्हा बियाण्यामध्ये दोष असल्याचे मान्य करून शेतकऱ्यांना दोन दिवसांमध्ये नुकसानभरपाई देणार असल्याचे कंपनीकडून आश्वस्त करण्यात आले. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार दाखल केली नाही.
एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्चबापना कंपनीच्या बियाण्याची एक बैंग ३२०० रुपयांना मिळते. सोबत रासायनिक खत व पेरणीचा खर्च धरून एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च येतो.
"तक्रारी येताच त्या संबंधित कंपनीच्या बियाण्यांची विक्री बंद केली. बियाणे खरेदी करून अद्याप पेरणी केली नाही, अशा बियाणे परत घेतले आहे."- पंकज कांडलकर, विक्रेता, गुरूदेवनगर