'त्या' वसतिगृहाची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Updated: September 11, 2016 00:12 IST2016-09-11T00:12:43+5:302016-09-11T00:12:43+5:30
पांढरी खानमपूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न प्रथमच घडला.

'त्या' वसतिगृहाची सुरक्षा वाऱ्यावर
अंजनगाव सुर्जी : पांढरी खानमपूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न प्रथमच घडला. तरी येथील सुरक्षिततेच्या बाबतीतील ढिसाळपणा या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला. ज्या पद्धतीने या विद्यार्थिनीला केवळ एका अर्जाच्या आधारे, आई-वडील वगळून व त्यांच्याशी मोबाईल संपर्क न होता एका अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले, ही पद्धत अतिशय चुकीची व हलगर्जीपणाची आहे. पांढरी गावापासून दीड कि.मी अंतरावर लोकवस्ती नसलेल्या या निर्जन जागेवरच्या वसतिगृहात १३५ मुली राहतात. सुरक्षेचा आढावा घेऊन समाजकल्याण विभागाने येथील नियमांची आचारसंहिता लेखी पद्धतीने राबविणे आवश्यक आहे.
पांढरीच्या या निवासी वसतिगृहात महिला अधीक्षकाचे पद आहे. पण या अधीक्षकाकडे दर्यापूरचा अतिरिक्त प्रभार आहे आणि या महिला अधीक्षक दर्यापूर येथेच राहतात. पांढरी येथील प्रशासन व सुरक्षा व्यवस्था सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर सोडून देण्यात आली आहे. तब्बल १३५ मुली असलेल्या या वसतिगृहात शासनातर्फे जबाबदार महिला अधिकारी राहत नाही, ही शोकांतिका आहे. टोलेजंग इमारत असलेल्या या वसतिगृहाच्या पश्चिम दिशेच्या कंपाऊंडला पडलेले मोठे छिद्र तात्पुरती डागडुजी करून बंद करण्यात आले आहे. याठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास जनरेटरची कोणतीही व्यवस्था नाही. सर्वात महत्वाचे हे की मुलींचे वसतीगृह असून सुद्धा याठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविलेले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)