सावरखेड पिंगळाईत महिलांनी काढली धोंडी
By Admin | Updated: July 20, 2015 00:10 IST2015-07-20T00:10:33+5:302015-07-20T00:10:33+5:30
मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सावरखेड पिंगळाई येथील शेतकऱ्यांची पिके कोमेजली आहे.

सावरखेड पिंगळाईत महिलांनी काढली धोंडी
लेहगाव : मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सावरखेड पिंगळाई येथील शेतकऱ्यांची पिके कोमेजली आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असल्याने वरुणराज्याला प्रसन्न करण्यासाठी स्थानिक महिलांनी रविवारी धोंडी धोंडी पाणी दे ची आर्तहाक निसर्गाला दिली.
दरवर्षीपेक्षा यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस आल्याने भरपूर पीक होणार या आशेने शेतकरी सुखावला होता. शेतकऱ्यांनी घरात असलेले महागाईचे बियाणे शेतात पेरले. सुरुवातीला पाऊस चांगला आला परेणीही साधली. परंतु मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. अनेक पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. बँकेचे व सावकाराचे कर्ज घेऊन शेती उभी केली. परंतु शेवटी पाऊस न आल्यामुळे शेती पिकलीच नाही. त्यामुळे बँकेचे व सावकाराचे कर्ज फेडू शकला नाही. यावर्षी पुन्हा उसनवार पैसे आणून पेरणी केली. २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीसाठी त्यांचे पैसे नसल्यामुळे आता शेतकऱ्यां समोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
पावसाची वाट पाहून थकलेल्या मजूर व शेतकरी महिलांनी सावरखेड पिंगळाई येथे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ चा नारा दिला. त्यांच्या आर्त हाकेला निसर्ग कितपत प्रतिसाद देते हे निसर्गावर अवलंबून आहे. पावसाची आता गरज आहे. मजुरांनाही काम नाही. पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती आहे.
या धोंडीमध्ये पुष्पा पाटील चंद्रकलाबाई ठवळी, मधुराबाई ठवळी, उषा पडोळे, रेर्खा निचित, शोभा काकडे, नंदा ठवळी, रुखमनबाई ठाकूर, दुर्गा ठवळी, वच्छलाबाई ठाकूर, किरण ठवळी, रंजना ठवळी, संध्या निचित, तुळसाबाई पुंड, इंदिराबाई काजळकर, सुलोचनाबाई खंडारकर, उषाबाई ठाकूर, जोत्स्ना ठाकूर, बबिता ठाकूर, आदी गावातील बचत गटाच्या महिला सहभागी होत्या. धोंडी नंतर महिलांनी हनुमानाच्या मंदिरात भजन करुन जलाभिषेक करण्यात आला.