मेळघाटातील वणव्यावर 'सॅटॅलाइट'ने लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:06+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ८३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर सिपना वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ७९३ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्या भागात चराई करणे, मोहफुले वेचणे, तसेच द्वेषभावनेतून वणवासारख्या मोठ्या घटना घडल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. हा वन वणवा लोकसहभागाशिवाय नियंत्रणात आणणे शक्य नाही. गतवर्षी सिपना वन्यजीव विभागात वन वणव्याच्या २१८ घटना घडल्याची नोंद आहे. त्यामध्ये २२०६ हेक्टर क्षेत्र जळून राख झाले. हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्राच्या २.७८ टक्के क्षेत्र आहे.

मेळघाटातील वणव्यावर 'सॅटॅलाइट'ने लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अतिसंरक्षित जंगलांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात वनवणवा पेटतो. ते थांबवण्यासाठी स्थानिक लोकसभाग आवश्यक असून, सिपना वन्यजीव विभागांतर्गत बोराट्याखेडा व रायपूर परिसरात ६० दिवसांत आगीची एकही घटना घडली नाही. लोकसहभागाचे ते एक उत्तम उदाहरण ठरले आहे. दरम्यान मेळघाटातील वणव्यावर 'सॅटेलाईट'ने लक्ष ठेवले जाणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ८३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर सिपना वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ७९३ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्या भागात चराई करणे, मोहफुले वेचणे, तसेच द्वेषभावनेतून वणवासारख्या मोठ्या घटना घडल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. हा वन वणवा लोकसहभागाशिवाय नियंत्रणात आणणे शक्य नाही. गतवर्षी सिपना वन्यजीव विभागात वन वणव्याच्या २१८ घटना घडल्याची नोंद आहे. त्यामध्ये २२०६ हेक्टर क्षेत्र जळून राख झाले. हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्राच्या २.७८ टक्के क्षेत्र आहे.
वनवा नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यानुसार सिपना वन्यजीव विभागामध्ये ग्राम परिस्थिती विकास समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये परिसरातील आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत गाभा क्षेत्रात १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिलपर्यंत वन वणव्याची एकही घटना न घडल्यास १० हजार रुपये, १५ फेब्रुवारी ते १५ मेपर्यंत वणव्याची घटना न घडल्यास ३० हजार रुपये, तर १५ फेब्रुवारी ते वन हंगाम संपेपर्यंत एकही न घटना घडल्यास ६० हजार रुपये, असे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.
बोराट्याखेडा, रायपूरचे ग्रामस्थ सहभागी
सिपना वन्यजीव विभागाच्या रायपूर परिक्षेत्रातील बोराट्याखेडा व रायपूर या गावांनी व्यापक प्रतिसाद दिला. ही दोन्ही गावे अतिसंरक्षित क्षेत्रात आहेत. गावाशेजारी जंगलामध्ये उन्हाळा सुरू झाल्यापासून १५ एप्रिलपर्यंत एकही आगीची घटना घडली नाही. आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्याचे काम लक्षात घेता या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिला.
असे ठेवले जाते आगीवर नियंत्रण
फॉरेस्ट सर्व्हे ऑफइंडिया (नासा) या वेबसाईटवर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे. सिपना वन्यजीव विभागांतर्गत पाच परिक्षेत्रात मोक्याच्या १७ ठिकाणी आग निरीक्षण टॉवर लावले आहेत. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा कर्मचारी तैनात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक उपवनसंरक्षक शिवाबाला, वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्र कर्मचारी लक्ष ठेवून आहेत