संत अच्युत महाराजांना साश्रुनयनांनी आदरांजली
By Admin | Updated: October 5, 2015 00:25 IST2015-10-05T00:25:31+5:302015-10-05T00:25:31+5:30
ब्रह्मलिन संत अच्युत महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तालुक्यातील श्रीक्षेत्र शेंदूरजनाबाजार येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात शेकडो भक्तांनी साश्रूनयनांनी आदरांजली वाहिली.

संत अच्युत महाराजांना साश्रुनयनांनी आदरांजली
तृतीय पुण्यतिथी : शेंदूरजनाबाजार येथे उसळला जनसागर
रोशन कडू तिवसा
ब्रह्मलिन संत अच्युत महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तालुक्यातील श्रीक्षेत्र शेंदूरजनाबाजार येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात शेकडो भक्तांनी साश्रूनयनांनी आदरांजली वाहिली.
श्री संत अच्युत महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव शनिवार ३ आॅक्टोबरपासून सुरू आहे. या कार्यक्रमात सकाळी श्रींचा अभिषेक, सकाळी ९ वाजता अच्युत भजनावलीची प्रस्तुती हभप देवीदास सावरकर, रायजीप्रभू शेलोकर यांच्या संबोधनाने झाली. श्रीसंत अच्युत महाराज स्मृती महापूजा व अच्युत नाम जपयज्ञ पार पडला. रात्री कीर्तनकार हभप संजय महाराज ठाकरे यांचे प्रबोधन झाले. रविवारी सकाळी ६.३० वाजता गावात मिरवणूक काढण्यात आली. शेंदूरजनाबाजारच्या चौकाचौकांत पुष्पगुच्छ हार आतषबाजीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. पश्चात महाराजांना मौन आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला जिल्ह्यासह राज्यातून हजारो भक्तगण उपस्थित होते. यावेळी संत भानुदास महाराज, हभप कनेरकर महाराज, हभप सचिन देव, संस्थानचे अध्यक्ष अनिल सावरकर, सुधीर दिवे, अनंत धर्माळे, सरपंच सागर बोडखे, युवराज भोजने, सतीश सावरकर, प्रमोद निमकर, विवेक सावरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय देवळे यांनी, तर आभार प्रदर्शन गोपाल देवळे यांनी केले. कार्यक्रमात अच्युतभक्तांची मोठी उपस्थिती होती.