ग्रामीण भागात मागील वर्षी ४,१५१ गुन्ह्यांची नोंद
By Admin | Updated: May 27, 2015 00:20 IST2015-05-27T00:20:07+5:302015-05-27T00:20:07+5:30
जिल्ह्यात गुन्ह्याच्या संख्येत वाढ होत आहे. मागील वर्षीचा विचार केल्यास २९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ४ हजार १५१ गुन्ह्यांची ...

ग्रामीण भागात मागील वर्षी ४,१५१ गुन्ह्यांची नोंद
५१ हत्या, १०३ बलात्कार : ४१५ विनयभंग, २३७ अपघात, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनत वाहनेही वाढलीत
सुरेश सवळे चांदूरबाजार
जिल्ह्यात गुन्ह्याच्या संख्येत वाढ होत आहे. मागील वर्षीचा विचार केल्यास २९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ४ हजार १५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात ५१ हत्या, ४१५ विनयभंग, १०३ बलात्कार, ६ जबरी चोरी व दरोड्यांचा समावेश आहे. लहानसहान वादातून हत्या झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. तंटामुक्तीच्या माध्यमातून बऱ्याचशा फौजदारी व दिवाणी गुन्ह्यांना आळा बसला असला तरी ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेणे पोलिसांना बंधनकारक असल्यामुळे गुन्ह्याच्या नोंदीत वाढ झाल्याचे दिसते. विवाहाचे आमिष देऊन बलात्कार करणे व विनयभंगाची प्रकरणे ग्रामीण भागात वाढीस लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात गतवर्षी १०३ प्रकरणात कलम ३७६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
महिला व युवतीसोबत छेडछाड अशा प्रकारच्या विनयभंगप्रकरणी गतवर्षी ग्रामीण पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत ४१५ गुन्हे दाखल केले. धार्मिक स्थळासह विविध कारणांतर्गत दंगा व सामूहिक विवाद निर्माण करणाऱ्यांवर १४३, १४७, १४८ अंतर्गत ६५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंदले गेले आहेत.
जमीन, वारसहक्क, आपशी विवाद, मारपीटसह अन्य प्रकरणांत झालेल्या हत्येच्या प्रकरणात मागील वर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात ३०७ अंतर्गत ६५ गुन्हे दाखल करण्यात आले.
नोकरीचे आमिष दाखवून ठगविण्याच्या प्रकरणात ४२० अंतर्गत ९२ गुन्हे दाखल करण्यात आले. किरकोळ विवादातून मारपीट प्रकरणात जिल्ह्यात ३२४, ३२६ अंतर्गत १८७१ गुन्हे दाखल झालीत. दरोडा व जबरन चोरीच्या प्रकरणात ३९५ अन्वये ६ ठिकाणी असे गुन्हे समोर आले आहे. यातही दंगा व लूट करणाऱ्यावर १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हे दाखल झाले. दिवसाढवळ्या व रात्री चोरीच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी १२२१ प्रकरणात ३७९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
भरधाव व अनियंत्रित वाहन चालविणे आता नित्याची बाब झाली आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविण्यालाही म्हणावा तसा प्रतिबंध बसलेला नाही. अल्पवयीन बालकांची वाहन चालविण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. त्यावर पोलीस व पालक यांचा म्हणावा तसा अंकुश नसल्यामुळे सडक दुर्घटनेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशातच वाहनचालक व पादचाऱ्यांचा मृत्यू ओढवतो. अशा प्रकारच्या २३७ प्रकरणांत मागील वर्षी ग्रामीण पोलिसांनी २३७, ३३९, ४२७, ३०७ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. लोकसंख्येच्या वाढीसोबतच वाहनांची वाढती संख्या व वाहतूक व्यवस्थेत नियोजनाचा अभाव यामुळे सडक दुर्घटनेत वाढ होत आहे, हे विशेष.