दंगलीच्या अफवेने अंजनगावातील बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST2021-01-23T04:13:33+5:302021-01-23T04:13:33+5:30
आपसी वादातून दोन गटांत हाणामारी : १४ ते १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल अंजनगाव सुर्जी : शहरातील पान अटाई ...

दंगलीच्या अफवेने अंजनगावातील बाजारपेठ बंद
आपसी वादातून दोन गटांत हाणामारी : १४ ते १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
अंजनगाव सुर्जी : शहरातील पान अटाई भागालगत एका चहा टपरीवर मुस्लिम समाजातील दोन गटांत हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला. नौगाजी भागात त्या वादाचे पडसाद मात्र वेगळेच उमटले. अफवा व दहशतीमुळे व्यापारी वर्गाने आपली दुकाने तातडीने बंद केली. २० जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. क्षुल्लक वादाला दंगलीचे वळण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अतिसंवेदनशील असलेल्या अंजनगावला गालबोट लागले नाही.
नेमका वाद काय झाला, कुणाशी झाला, हे माहीत नसताना मोठा जमाव एकत्र आला. त्या जमावाने प्रकरणाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच सहायक ठाणेदार विशाल पोळकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढली. मात्र, त्यानंतरही त्या भागात अफवांचा बाजार गरम होता. दरम्यान, याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी दोन गटांतील १४ ते १५ जणांविरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हे दाखल केले. तक्रारीनुसार, नौगाजी प्लॉट येथील मो. शोएब शेख नासीर (३५) यांचा २० जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पानअटाई येथील रहमानभाईच्या चहाच्या दुकानात काहींशी वाद झाला. तो वाद मिटलादेखील. मात्र, त्याच वादातून आरोपी अशिक शेख अजीज शेख याने मो. शोएबशी वाद घालत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच आरोपी शेख अजीज, जुबेर ऊर्फ जब्बू, शेख फैयाज व शेख कासमचा मुलगा (सर्व रा. पिंजारपुरा) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मो. शोएब यांना लाथाबुक्यांनी मारले, शिवीगाळ केली. प्रत्युत्तरात मो. शोएब यांनी मारहाणीची माहिती नातेवाइकांना फोनवरून दिली. यानंतर सात ते आठ लोकांनी हॉटेलमधील बल्लीने आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार मो. जुबेर मो. इकबाल (३०, काझीपुरा) यांनी नोंदविली. चहा पिण्याच्या क्षुल्लक वादातून १० ते १५ जणांचा गट समोरासमोर उभा ठाकल्याने रहमानभाईच्या दुकानाजवळ मोठा जमाव एकत्र आला. त्या जमावामुळे शनिवारा भागात मोठी दंगल झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने घाईगडबडीत बंद केली. झालेल्या वादाचे पडसाद नौगाजी भागात उमटले. परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.
यांच्याविरुद्ध झाले गुन्हे दाखल
मो. शोएब शेख नासीरच्या तक्रारीवरून २१ जानेवारी रोजी रात्री १२.३६ वाजता अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आशिक शेख अजीज शेख, शेख अजीज, जुबेर ऊर्फ जब्बू, शेख फैय्याज व शेख कासमच्या मुलगा (सर्व रा. पिंजारपुरा) यांच्याविरूद्ध भादंविचे कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. तर, मो. जुबेर मो. इकबाल याच्या तक्रारीवरून मो. शोएब, फरहान व ७ ते ८ इसमांविरुद्ध भादंविचे कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोट
परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.
- विशाल पोळकर, सहायक ठाणेदार, अंजनगाव सुर्जी
----------