परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:52+5:302021-03-19T04:12:52+5:30
अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील गट अ व गट ब संवर्गातील पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी २१ मार्च ...

परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील गट अ व गट ब संवर्गातील पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी २१ मार्च रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. तत्पूर्वी परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे लोकसेवा आयोगाकडून बंधनकारक केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चाचणी केंद्र सुरू केले असून, सर्वांनी मुदतीत चाचणी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
परीक्षेसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी या चाचणी केंद्रावर वेळेत येऊन स्वॅब द्यावा व वेळीच अहवाल प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी संबंधितांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या बदली वेळीच पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे व परीक्षा केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरेसा स्टाफ उपलब्ध ठेवला जाईल. परीक्षा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.