सिंचन विहिरींचा मोबदला आरटीजीएसव्दारे
By Admin | Updated: March 15, 2017 00:11 IST2017-03-15T00:11:47+5:302017-03-15T00:11:47+5:30
धडक सिंचन विहिरींच्या कामाचा मोबदला धनादेशाऐवजी आरटीजीएसव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा...

सिंचन विहिरींचा मोबदला आरटीजीएसव्दारे
जिल्हा परिषदेचा निर्णय : रक्कम थेट खात्यात जमा करण्याचे सीईओंचे निर्देश
अमरावती : धडक सिंचन विहिरींच्या कामाचा मोबदला धनादेशाऐवजी आरटीजीएसव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी घेतला आहे. यासंदर्भात ८ मार्च रोजी सीईओंनी आदेश जारी केले आहेत.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या धडक सिंचन योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदे यंत्रणामार्फत केली जाते. त्यानुसार पात्र असलेल्या लाभार्थ्यांना याचा मोबदला सिंचन विहिरीचे कामे पूर्ण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना धनादेशाव्दारे मोबदला दिला जात असल्याची बाब मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी नुकत्याच घेतलेल्या धडक सिंचन विहिरी योजनेच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आली. परिणामी धडक सिंचन विहिरींचा धनादेश मिळाल्यानंतर संबंधितांना बँकेत जमा करण्यासाठी विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. धडक सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे जिल्हा परिषदेच्या यंत्रणामार्फत केल्या जाणाऱ्या धडक सिंचन विहिरीचा मोबदला हा आरटीजीएस प्रणालीव्दारे संबंधित लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात बुधवारी दिल्या आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी यासंदर्भातील जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग आदींसह बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा या तीनही विभागाच्या उपअभियंत्यांना एका पत्राव्दारे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार
धडक सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जिल्हा परिषद यंत्रणेकडून विहिरींचा मोबदला धनाव्दारे दिला जात होता. विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतर हा धनादेश बँकेत जमा करण्यासाठी जवळपास आठ दिवसांचा अवधी जात होता. परिणामी लाभार्थी शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत होता. ही गैरसुविधा लक्षात घेता यापुढे आरटीजीएस प्रणालीव्दारे मोबदल्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वेळेचीही बचत होणार आहे.