‘रोहयो’चा पूरक कृती आराखडा १०२२ कोटींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:11+5:302021-02-06T04:21:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा ...

‘रोहयो’चा पूरक कृती आराखडा १०२२ कोटींचा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा सुमारे १,०२२ कोटी ०२ लाख ४१ हजार रूपयांचा पूरक कृती आराखडा तयार केला आहे. तर सन २०२१-२२ या वर्षाचा मूळ कृती आराखडा ४३९३.३३ लाख ४४ हजार रूपयांचा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या आराखडयात शेततळी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सिंचन विहीर, पाझर तलाव दुरूस्ती, अंगणवाडी बांधकाम, गाेठा, गांडूळ खत अशी पूरक आराखड्यातील ९१,०५० एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे ३ कोटी ०१ लाख ७९ हजार ८११ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार असून, हा आराखडा १,०२२ कोटींचा पूरक आराखडा आहे. याशिवाय सन २०२१-२२ या वर्षाच्या मूळ कृती आराखडयात २ लाख ७३ हजार ०७ एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे २० कोटी ४१ लाख २२ हजार ४४४ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार आहे. हा मूूळ आराखडा ४,३९३ कोटी ३३ लाख ४४ हजारांचा आहे. यामुळे जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुढील वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात रस्ते, वृक्षलागवड व संगोपन, सिंचन विहीर, जलसंधारणविषयक कामे (सीसीटी, लूजबोल्डर, शेतबांध बंदिस्त) फळबाग, रेशीम लागवड, रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प, गोठे, शेळीपालन, कुक्कटपालन शेड, घरकुल, शौचालय अंतर्गत कामे यासोबतच अन्य कामेदेखील करण्यात येणार आहेत.
बॉक्स
गत दहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शासनाने रोजगार हमी योजनेला मंज़ुरी दिल्याने ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी हाताला काम मिळणार आहे. सध्या अर्थचक्र मंदावल्यामुळे या कामांना गती मिळावी, म्हणून शासनाने ‘रोहयो’ची कामे सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणार असून, या कामांचा गावांना फायदा होणार आहे.
कोट
जिल्ह्यात ‘रोहयो’ची कामे सुरू झाली आहेत. या कामांच्या माध्यमातून सर्वस्तरातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना कामाची आवश्यकता आहे, त्यांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊ.
प्रवीण सिन्नारे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
रोहयो विभाग, जिल्हा परिषद