अतिक्रमणात हरविले रस्ते
By Admin | Updated: January 11, 2016 00:09 IST2016-01-11T00:09:57+5:302016-01-11T00:09:57+5:30
गावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

अतिक्रमणात हरविले रस्ते
चांदूरबाजारमधील स्थिती : पालिकेची मालमत्ता अतिक्रमणात
सुमित हरकुट चांदूरबाजार
गावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याचा प्रत्यय स्थानिक नगरपालिका हद्दीची बाजारपेठ पाहिल्यावर लक्षात येते. येथील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असताना अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेच्यावतीने कोणतीही ठोस कार्यवाही करीत नाही.
चांदूरबाजार हे गाव परतवाडा-मोर्शी तसेच अमरावती व मध्य प्रदेश सीमेच्या मधोमध आहे. येथील बाजारपेठ मोठी आहे. या गावाला जवळपास ६० ते ७० खेडे लागून असल्याने येथे नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी रेलचेल असते. मात्र येथील अतिक्रमण रहदारीस अडचण निर्माण करीत आहे. अतिक्रमणाची ही समस्या अनेक वर्षांपासून असूनही ते काढण्यास पालिका प्रशासनातर्फे कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात येत नाही. स्थानिक नगरपालिका मुख्याधिकारी तसेच जनप्रतिनिधी अतिक्रमण काढण्याबाबत मौन असल्याने सामान्य जनतेला बाजारपेठात पायदळ चालणेसुध्दा दुरापास्त झाले आहे. विशेष म्हणजे गावातील अतिक्रमण न काढण्याचा व अतिक्रमण करणाऱ्यांना सहयोग करण्याचा विडाच काही पालिका सदस्यांनी उचललेला आहे.
आपले मताचे राजकारण तसेच अर्थकारणामुळे काही नगरसेवकांनी शहराला कुरुपतेची चादर पांघरुण शहरातील नागरिकांना वेठीस धरले आहे. शहराच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एवढे अतिक्रमण वाढले आहे की, अनेकांनी अर्ध्या रस्त्यावर दुकाने थाटली आहे.
रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच शहरात दिवसेंदिवस लोकांची रहदारी वाढलीच आहे. तालुक्यातील ही सर्वात मोठी बाजारपेठ असून गावाचा विकास अतिक्रमणामुळे खुंटत चालला आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने लोकप्रतिनिधीविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी, अमरावती यांनीच सोडवावा, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.