धामणगाव तालुक्यातील रस्ते अतिक्रमणात
By Admin | Updated: July 22, 2015 00:47 IST2015-07-22T00:47:21+5:302015-07-22T00:47:21+5:30
शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात ...

धामणगाव तालुक्यातील रस्ते अतिक्रमणात
समित्या अद्यापही स्थापन नाही : ग्रामविकास खात्याच्या आदेशाला के राची टोपली
धामणगाव रेल्वे : शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा आदेश असताना या आदेशाला धामणगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. परिणामी शासकीय जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे.
शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून प्रत्येक गावात ग्रामसभेत अतिक्रमण हटाव समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्व पंचायत समित्यांद्वारे ग्रामपंचायतींना दिले होते़ या समितीमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचा समावेश करण्याचे आदेशात म्हटले होते़ गावात ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना प्रथम सूचना करणे, नोटीस बजावणे त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास पोलीस ठाण्याला माहिती देऊन तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेशात नमूद केले आहे़ परंतु धामणगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींत अतिक्रमण हटाव समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याची बाब पुढे आली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील गावे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहेत़
गाव पुढाऱ्यांचेच अतिक्रमण
आपल्या गावात सर्वसामान्य माणसावर रूबाब दाखविणाऱ्या गाव पुढाऱ्याने ग्रामपंचायत हद्दीतील ही शासकीय जागा अनधीकृतपणे ताब्यात घेतली आहे़ गावातील ग्रामसेवकांनी संबंधितांना एखादी नोटीस बजावली तर वरिष्ठ नेत्यांकडून दडपण टाकण्याचा प्रकार यापूर्वी घडले असल्यामुळे रस्त्यावरील अथवा शासकीय जागेवरील हे अतिक्रमण काढण्यास स्थानिक यंत्रणा पुढाकार घेत नाही़ ही वस्तुस्थिती असल्याचे अतिक्रमण केलेल्या गावातील ग्रामसेवकांनी सांगितले़
तहसील कार्यालयात तक्रारी
गावात रस्त्यावर व खाली जागेवर संबंधित व्यक्तीने अतिक्रमण केल्याच्या तक्रारी तहसील व पंचायत समिती कार्यालयात आठवड्यातून एक किंवा दोन अर्ज येत असल्याचे दिसत आहे़ विशेषत: अतिक्रमणा संदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच दिवाणी न्यायालयात अनेक प्रकरणे अद्यापही सुरू आहे़ न्यायालयाने निर्णय दिल्यास तेवढ्यापुरते अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)
तालुका प्रशासन
कधी घेणार पुढाकार ?
शेतातील पांदण रस्ते महसूल विभागाने राबविलेल्या राजस्व अभियानातून मोकळे झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी हे रस्ते मोकळी केले आहेत़ परंतु दैनंदिन जीवनात ज्या भागात वास्तव्य करावे लागतात त्या भागातील रस्ते अरूंद झाल्याने गावात आता राजस्व अभियानाद्वारे शासकीय अतिक्रमित जागा मोक ळ्या करण्याचे अभियान राबविणे गरजेचे आहे़
प्रत्येक गावातील अतिक्रमण वाढू न देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असते़ त्यासंदर्भात तालुका प्रशासन व पोलिसांचे सहकार्य लागल्यास आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहेत़ ग्रामपंचायतीने आता आपली जबाबदारी ओळखून गावांना मोकळा श्वास घेण्यासाठी हे गावातील अतिक्रमण हटवावे.
- श्रीकांत घुगे,
तहसीलदार, धामणगाव रेल्वे.
पंचायत समितीत अशा अतिक्रमणाच्या तक्रारी येताच त्वरित कार्यवाही करण्यात येते़ ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत़ जे ग्रामसेवक सूचनेचे पालन करणार नाही त्यांच्याविरूध्द प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे़
- बंडू घुगे,
गटविकास अधिकारी, प़ंस़धामणगाव रेल्वे.