टाळेबंदीतही रस्ते फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:42+5:30
जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरावती जिल्हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला. त्याकारणाने १७ मे पर्यंत दोन आठवडे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. परंतु या आदेशाची पायमल्ली होत आल्याचे सोमवारी अमरावतीकरांच्या वागणुकीतून बघावयास मिळाले.

टाळेबंदीतही रस्ते फुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १७ मे पर्यंत टाळेबंदी व संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. टाळेबंदी कायम असतानाही सोमवारी सकाळी ८ वाजतानंतर हजारो नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आले. शहरातील मुख्य चौकात नागरिकांची प्रचंड गर्दी बघावयास मिळाली. नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचीसुद्धा ऐशीतैशी केली, तर ‘फिजिकल डिस्टंसिंग’चाही फज्जा उडाला. शहरातील पोलिसांनी मात्र, बघ्याची भूमिका घेतली.
जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरावती जिल्हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला. त्याकारणाने १७ मे पर्यंत दोन आठवडे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. परंतु या आदेशाची पायमल्ली होत आल्याचे सोमवारी अमरावतीकरांच्या वागणुकीतून बघावयास मिळाले. जणू काही शिथिलताच मिळाल्यागत नागरिक सकाळी घराबाहेर पडले. येथील राजकमल चौक, राजापेठ, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक, गाडगेनगर, कठोरा नाका चौकासह इतर महत्वाच्या चौकात नागरिकांनी गर्दी केली. तसेच दुचाकीवर विनाकारण शहरात फिरण्यास बंदी असताना एकाच दुचाकीवर दोघे-तिघे बसून मुक्त संचार करताना निदर्शनास आले. शेकडो नागरिक चारचाकी वाहनाने शहरात फिरताना दिसून आले. एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग शहरात झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे नागरिक आपली व कुटुंबीयांची पर्वा न करता बिनधास्त शहरात फिरताना आढळले. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत बाहेर पडता येते. परंतु विनाकारण हजारो नागरिक घराबाहेर पडल्याने प्रशासनाचे नियंत्रण कुठेय, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता एकीकडे शासन-प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र, नागरिक घराबाहेर पडून आपला जीव धोक्यात घालत आहे. सोमवारी दृष्टीस पडलेल्या गर्दीमुळे हे स्पष्ट दिसून आले आहे. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी पुढाकार घेऊन याची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मजुरांची परवानगी मिळविण्याकरिता गर्दी
मध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांतील जे मजूर अमरावतीत कामानिमित्त आले होते व लॉकडाऊनमुळे अमरावतीत अडकले, त्या मजुरांना मूळ गावी परत जाता यावे, याकरिता प्रशासनाने परवानगी द्यावी, या मागणीकरिता सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यास शेकडो मजूर गोळा झाले. रांगेत उभे राहून त्यांनी अर्ज दिला. यावेळी ‘फि जिकल डिस्टंसिंग’ ठेवला नव्हता. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्याकरिता गर्दी
अमरावतीत अडकलेल्या मजुरांना मूळ गावी जाता यावे, याकरिता त्यांना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाने अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेकडो मजुरांनी सदर प्रमाणपत्र मिळविण्याकरिता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती. तेथेसुद्धा फि जिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. शहरात रोज कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असताना मजूर व नागरिक ठिकाणी गर्दी करीत आहेत.