पावसाच्या पुनरार्गमनाने भातकुली तालुक्यातील पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:33+5:302021-07-19T04:09:33+5:30
रखडलेल्या पेरणीची पुन्हा लगबग, भातकुली तालुक्यात ९० टक्के पेरणी आटोपली टाकरखेडा संभू : दुबार पेरणीच्या सावटात शेतकरी असताना भातकुली ...

पावसाच्या पुनरार्गमनाने भातकुली तालुक्यातील पिकांना संजीवनी
रखडलेल्या पेरणीची पुन्हा लगबग, भातकुली तालुक्यात ९० टक्के पेरणी आटोपली
टाकरखेडा संभू : दुबार पेरणीच्या सावटात शेतकरी असताना भातकुली तालुक्यात १५ दिवसांच्या दडीनंतर बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच रखडलेल्या पेरणीलादेखील आता जोरात सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९० टक्के पेरणी आटोपली आहे.
यावर्षी आधीच मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी चांगला सुखावला आणि जुलैपासून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. भातकुली तालुक्यात ७० टक्के पेरणी आटोपली, मात्र पावसाने अचानक दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. परंतु, पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने तालुक्यातील ७० टक्के पिकांना नवसंजीवनी मिळाली. याशिवाय रखडलेल्या पेरणीलादेखील जोरात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० टक्के पेरणी आटोपली आहे.यामध्ये कापसाची सर्वाधिक १० हजार २१५ हेक्टर म्हणजेच १२९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. त्यापाठोपाठ सोयाबीन ८४, तूर ८१, उडीद ८८, मूग ३२, मका ४० टक्के क्षेत्रावर पेरला आहे. या पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.