मोफत पाठ्यपुस्तकांचा यंदा पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:30+5:302021-02-05T05:25:30+5:30

अमरावती : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके दिली जातात. एकदा पुस्तके ...

Reuse of free textbooks this year | मोफत पाठ्यपुस्तकांचा यंदा पुनर्वापर

मोफत पाठ्यपुस्तकांचा यंदा पुनर्वापर

अमरावती : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके दिली जातात. एकदा पुस्तके दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे यावर्षीपासून पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. जुन्या विद्यार्थ्यांची चांगल्या अवस्थेतील पाठ्यपुस्तके पुढील सत्रातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. त्यामुळे शासनाच्या पुस्तकांच्या निर्मितीवर होणाऱ्या खर्चाला आळा बसणार आहे. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळांना दिले आहेत.

पाठ्यपुस्तकातून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येत असल्याचा दाखला शिक्षण विभागाकडून दिला जात आहे. मोफत पाठ्यपुस्तकांवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. काही विद्यार्थी पाठ्यपुस्तके सुस्थितीत ठेवतात. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ ते ८च्या १,५८६ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना गतवर्षी जूनमध्ये लाखो पाठ्यपुस्तकांचे संच वितरित केले होते. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी तर पाठ्यपुस्तके उघडूनही बघितलेली नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पुढच्या सत्रात शाळा परत घेणार आहेत. चांगल्या अवस्थेत असलेली पुस्तके नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत. याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला तसे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन शिक्षकांमार्फत केले जात आहे. यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगितले जात आहे. मात्र, पुस्तके जमा करण्याची सक्ती करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.

बॉक्स

संच परतीचे चित्र स्पष्ट होणार

शिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक सत्रापासून यांची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील किती विद्यार्थी मोफत पाठपुस्तकांचे संच परत करतात, याबाबतचे चित्र नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर दिसून येणार आहे.

कोट

समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके दिली जातात. या पुस्तकांचा पुनर्वापर करावा, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार अंमलबजावणी निर्देश शाळांना दिले आहेत.

ई. झेड. खान

शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: Reuse of free textbooks this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.