सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा

By Admin | Updated: August 25, 2015 00:28 IST2015-08-25T00:28:40+5:302015-08-25T00:28:40+5:30

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाद्वारे महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.

Resolve the question of general public | सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा

सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा

पालकमंत्री पोटे यांचे प्रतिपादन : महाराजस्व अभियानांतर्गत समाधान योजनेचा प्रारंभ
अमरावती : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाद्वारे महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे महसूल व इतर शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न सामाजिक बांधिलकीतून निकाली काढावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने वलगाव येथे महाराजस्व अभियान २०१५-१६ अंतर्गत विस्तारित समाधान योजना या दिवसानिमित्त एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, वलगाव पंचायत समिती सदस्या सुनंदा उगले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, महाराजस्व अभियान हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. ग्रामीण भागातील जनतेचे, शेतकऱ्यांचे महसूल व इतर शासकीय विभागाशी संबंधित समस्या व अडचणींचे निराकरण गाव पातळीवर त्याच ठिकाणी संबंधित विभागाने करावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री म्हणाले. गाव पातळीवर ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती, त्यानुषंगाने मिळणारे विविध लाभ, महसूल विभागाशी संबंधित दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर, शेतीचा ७/१२ उतारा आदी महसूल विषयक कामे त्याच गावी एकाच ठिकाणी पारदर्शकतेने करावे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांची माहिती नागरिकांनी घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
अधिकारी हा शासनाचा चेहरा असतो. समाजात शासनाची प्रतिमा चांगली राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी शासनाव्दारे अन्न सुरक्षा योजना पुरस्कृत करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेचा दोन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो अन्नधान्य वितरित केले जाते. सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीयांच्या कल्याणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा. शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी महसूल विभागाव्दारे संगणीकृत शेतीचा ७/१२ उतारा फक्त रुपये १५ मध्ये शेतकऱ्यांच्या गावी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, घरकूल योजनेंतर्गत गरजू व खरोखर पात्र असणाऱ्या उमेदवारांना घरकूल उपलब्ध करून द्यावे. तसेच गावातील रस्ते दुरूस्ती, शेतजमीन वाटणी, अतिक्रमित जमीन, पाणंद रस्ते यासबंधीच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून खचलेल्या विहिरी बांधण्यासाठी निधी झाला पाहिजे, असे ठाकूर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी किरण गित्ते मार्गदर्शन करताना म्हणाले, महसूल विभागाद्वारे ग्रामस्थांच्या समस्या गाव पातळीवर सोडविण्यासाठी हे अभियान आहे. या शिबिरात कृषी, आरोग्य, जलसंपदा, शिक्षण, प्रादेशिक परिवहन, महसूल यासह इतर विभागांचे एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मार्च २०१६ पर्यंत सुमारे २०० कार्यक्रम या अभियांतर्गत घेण्यात येतील.
जिल्ह्यातील नागरिकांच्या काही तक्रारी व सूचना असल्यास त्या नोंदविण्यासाठी १८०० २३३ ६४४८ टोलफ्री क्रमांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे संचालन नीता लबडे यांनी तर आभार प्रदर्शन धीरज नांदवे यांनी केले. यावेळी वलगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Resolve the question of general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.