वृद्धांच्या 'विसाव्या'ची परवड
By Admin | Updated: September 21, 2016 00:16 IST2016-09-21T00:16:56+5:302016-09-21T00:16:56+5:30
आयुष्यभर मुलाबाळांसाठी राबराब राबूनही म्हातारपणी सहारा मिळेल, याच अपेक्षेवर असताना आपल्यांनी घरातून चालते केले.

वृद्धांच्या 'विसाव्या'ची परवड
उपेक्षा : प्रशासनाच्या दुर्लक्षाने वृद्धाश्रम बेदखल
नरेंद्र जावरे परतवाडा
आयुष्यभर मुलाबाळांसाठी राबराब राबूनही म्हातारपणी सहारा मिळेल, याच अपेक्षेवर असताना आपल्यांनी घरातून चालते केले. सहारा मिळाला तो वृद्धाश्रमाचा. मात्र त्याही विसावा देणाऱ्या वृद्धाश्रमाला शासनाने मागील पाच वर्षांपासून पूर्णत: दुर्लक्षित केल्यामुळे जवळपास १४ वृद्धांची परवड सुरू असल्याचे चित्र आहे.
परतवाडा-चांदूरबाजार मार्गावरील शेकापूर जवर्डी येथे सापन बहुुद्देशीय संस्था सावळी दातुरातर्फे २०१० पासून विसावा वृद्धाश्रम चालविण्यात येते. या वृद्धाश्रमात जिल्हाभरातील १४ वृद्ध पाच वर्षांपासून राहत आहेत. त्यांची पूर्णत: देखभाल, निवास व्यवस्था शासकीय नियमानुसार केली जात असतानासुद्धा शासनातर्फे अनुदानाच्या नावावर ठेंगा दाखविला आहे. विनाअनुदानित शाळा, वसतिगृह आदींसह इतर बाबीवर कोट्यवधींचा खर्च करणारे शासन वृद्धाश्रमावर मेहरबान नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुलाबाळांनी साथ सोडल्यामुळे उर्वरित आयुष्त निवांत जगता यावे यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून मिळेल त्या वाटेने निघालेल्या या वृद्धांना जवर्डी येथील विसावा वृद्धाश्रमाने आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा विसावा दिला. मात्र संस्था चालविण्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक खर्च भागविण्यासाठी संस्थाचालकांना सुद्धा इतरांपुढे मदतीचा हात मागत या वृद्धांच्या निवास, भोजन व्यवस्था करावी लागत आहे.
अन् मन हळहळले...
भाष्कर कौतिक्कर हे अचलपूर न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. येथे दररोज कौटुंबिक समस्या उद्भवल्यामुळे झालेला वादाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिजन येतात. यामध्ये सासू-सून व इतर कौटुंबिक वादाचा समावेश असतो. अशावेळी वयोवृद्ध येतात. त्यांच्या हालअपेष्टा व परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड, घरी परत जाण्यासाठी तिकिटाचे पैसेसुद्धा नसल्याचे चित्र नित्याचेच आहे. सासू-सुनेच्या वादात वृद्धांना घराबाहेर काढून देण्याचे प्रकार मन हेलावून टाकल्यामुळे भाष्कर कौतिक्कर यांनी वृद्धाश्रम उघडण्याचा प्रण केला आणि चांदूरबाजार मार्गावरील त्रिवेणी संगमनजीक सापन बहुउद्देशीय संस्थेंतर्गत विसावा वृद्धाश्रमाची स्थापना केली.
शासनाची उदासीनता
समाजकार्य करताना अनेक अडचणींचा सामना संस्था चालकांना करावा लागतो. मात्र ध्येयवेड्यांना आपले कार्य अविरत सुरु ठेवण्यासाठी कशाचीच तमा ते बाळगत नाहीत. शासन इतर संस्थांना अनुदान देत असताना घरातून आप्तस्वकीयांनीच बेदखल केलेल्या निराधार वृद्धांना आसरा देणाऱ्या संस्थांसाठी अनुदान देण्यास का विलंब करते, असा सवाल विसावातील वृद्धांनी केला आहे. शासनाने आम्ही जिवंत असताना मदत देऊन आमच्यावर उपकार करावे, अशी विनवणीदेखील त्यांनी केली आहे.
मागील पाच वर्षांपासून सुरू आसलेल्या वृद्धाश्रमाला शासनाने मदत करावी. ज्यामुळे वृद्धांसाठी अधिकाधिक सुविधा पुरविण्यात आर्थिक अड़चण येणार नाही. शासनाने कायदेशीररीत्या संस्थेला मदत करावी
- भास्कर कौतिक्कर,
संचालक, वृद्धाश्रम.