लाल मिरचीला दरवाढीचा तडका
By Admin | Updated: July 11, 2015 00:36 IST2015-07-11T00:36:58+5:302015-07-11T00:36:58+5:30
बाजारपेठेत लाल मिरचीची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे.

लाल मिरचीला दरवाढीचा तडका
ग्राहकांना फटका : आवक घटल्याचा परिणाम
अमरावती : बाजारपेठेत लाल मिरचीची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे. परिणामी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाऱ्या मिरचीसाठी ग्राहकांना १२० ते १४० रुपये मोजावे लागत आहेत. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक व विक्रेता सुखावले आहेत. ग्राहकांना मात्र महागाईचा फटका सहन करावा लागत आहे.
एकरी पाच ते सहा क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन होते. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. तसेच नगदी पैसा मिळवून देणारे हे महत्त्वाचे पीक असल्याने शेतकरी काही प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात.
यामध्ये जिल्ह्यात साधारणपणे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड केली जाते. हिरव्या मिरचीलादेखील सतत मागणी असल्याने ४० ते ६० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत आहे. त्यामुळे उत्पादक हिरवी मिरची लाल होण्याची प्रतीक्षा करीत नाहीत. त्यामुळे ५०८ टक्क्यांपेक्षा अधिक हिरवी मिरची लगेच विक्री होते. मागील वर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीचे दर प्रती किलो २० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. उत्पादन कमी असल्याने मिरचीचे दर पुढे कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
मिरचीचे महत्त्व
सर्व वर्गातील लोकांच्या आहारातील महत्त्वपूर्ण भाजीपाला पीक आहे. मिरची रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. मिरचीमध्ये अ, ब, आणि क जीवनसत्त्व, कॅलशियम फॉस्फरस बऱ्याच प्रमाणात असते. घसा साफ होणे, श्वास नलिकेचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी आहे. बलवर्धक औषधींमध्ये याचा उपयोग होतो. मिरचीचे बहुउपयोगी गुण लक्षात घेता बाजारपेठेत मिरचीला वर्षभर मागणी असते.
मिरचीची किंमत किमी-अधिक झाली तरी ग्राहकांना ती खरेदी करावीच लागते. याचे भाव बाजारपेठेत आल्यावर वाढतात हे निश्चित आहे. त्यामुळे भाववाढीचा लाभ उत्पादकांना होत नसून व्यापारी व दलालांना होतो. ग्राहक व उत्पादक दोन्ही नडवले जातात. कृत्रिम टंचाई निर्माण करुन अनेक जीवनावश्यक वस्तूंवर मधले विक्रेते अधिक नफा कमावत आहेत. त्यामुळे प्रशासन व शासन यांनी यावर नियंत्रण आणावे.
- हर्षा कावरे,
ग्राहक.