राणांनी केला सोफियाच्या पाणीपुरवठ्याचा 'व्हॉल्व' बंद
By Admin | Updated: May 1, 2016 00:02 IST2016-05-01T00:02:37+5:302016-05-01T00:02:37+5:30
महानगराला पाणी पुरवठ्यासाठी टंचाई जाणवत आहे. व शासनाव्दारा सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाला उर्ध्व वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

राणांनी केला सोफियाच्या पाणीपुरवठ्याचा 'व्हॉल्व' बंद
मुख्यमंत्र्यांना निवेदन : तीन महिन्यांसाठी पाणीपुरवठा बंद करा
अमरावती : महानगराला पाणी पुरवठ्यासाठी टंचाई जाणवत आहे. व शासनाव्दारा सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाला उर्ध्व वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ आ. रवी राणा यांनी शनिवारी सोफीयाला पाणी पुरवठा करण्यात येत असलेला व्हॉल्व बंद केला व तोडफोड केली.
याविषयीचे निवेदन नांदगावपेठ येथील कार्यक्रमात आ. राणा यांनी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना दिले. पाण्याअभावी नागरी जीवन होरपळून निघाले आहे. बडनेरा शहराला आठ ते दहा दिवस पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता बघता आजपासूनच सोफियाचा पाणी पुरवठा तीन महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आ.राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
शासनाने मद्य निर्मिती कारखान्याचे पाणी वाटप बंद केले आहे. हाच प्रयोग अमरावती जिल्ह्यातील सोफिया प्रकल्पाबाबत राबवावा आणि सोफियाला दिले जाणारे २४ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचे पाणी बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली. पाणीटंचाईमुळे बडनेरा शहराला १०-१० दिवस पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
विदर्भासह संपूर्ण राज्यात पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता अमरावती शहर आणि बडनेरा वासीयांमध्ये सोफियाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला देण्यात येणारे पाणी बंद करावे, अन्यथा युवा स्वाभिमान तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राणा यांच्या नेतृत्वात शनिवारी देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, रौनक किटुकले आदींची उपस्थिती होती.
राणांना विमानतळावर रोखले
मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी रवी राणा कार्यकर्त्यांसह बेलोरा विमानतळावर गेले असता त्यांना जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी रोखले. त्यांनी एकट्यानेच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करावे, अशी विनंती केली. मात्र, आ. राणा पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सूचनेने रोखण्यात आल्याचा आरोप राणा समर्थकांनी केला.