रणरागिणींचा लढा यशस्वी

By Admin | Updated: December 18, 2014 22:45 IST2014-12-18T22:45:14+5:302014-12-18T22:45:14+5:30

वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यासाठी मागील १० महिन्यांपासून सुरु असलेल्या महिलांच्या लढ्याला गुरुवारी यश आले. परवानाधारकाने स्वत: हे दुकान स्थानांतरित

Ranaragani's fight was successful | रणरागिणींचा लढा यशस्वी

रणरागिणींचा लढा यशस्वी

कोर्टातील याचिका ‘विड्रॉल’ : अखेर वडाळीतील दारु दुकान होणार स्थानांतरित
अमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यासाठी मागील १० महिन्यांपासून सुरु असलेल्या महिलांच्या लढ्याला गुरुवारी यश आले. परवानाधारकाने स्वत: हे दुकान स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला असून ते आठ आठवड्यांत स्थानांतरणासाठी प्रशासनाकडे अर्ज करतील. मात्र, या दुकानाच्या निवाड्यासाठी यापूर्वी दाखल याचिका ‘विड्रॉल’ करताना स्थानांतरणाचे शुल्क न आकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
‘दारू दुकान नकोच’ अशा निर्धाराने या भागातील महिलाशक्ती एकवटली होती. यासाठी सतत आंदोलन सुरुच होते.
प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास
फे ब्रुवारीमध्ये झालेल्या मतदानानंतर हे दुकान प्रशासनाच्या आदेशाने बंद करण्यात आले. मात्र या बंद असलेल्या दुकानासंदर्भात प्रशासनाने निर्णय घ्यावा, या आशयाची न्याय मागणारी याचिका परवानाधारक राजकुमारी प्रभू झांबानी, दिनेश खत्री, रवी खत्री या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातून दाखल केली होती.
त्यानुसार न्यायालयाने जिल्हा प्रशासनाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. त्यानुसार जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना या दुकानाबाबत निवडणूक घेण्याचे कळविले, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली. परिणामीे उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांच्या नावे नोटीस पाठविली. या दारु विक्रीच्या दुकानाबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक न्यायालयाची नोटीस मिळताच महापालिका आयुक्त चक्रावून गेलेत. ही बाब न्यायालयाच्या आदेशाचे अवमान होणारी असल्यामुळे आयुक्त अरुण डोंगरे यांनी २८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविणार, असे न्यायालयात प्रतीज्ञापत्र सादर केले. दारु दुकानाबाबत नव्याने मतदान होणार हे निश्चित होताच आंदोलक महिला एकवटल्या. गत आठवड्यात वडाळीतील देशी दारु दुकानासमोरील मुख्य मार्गावर रस्ता अडवून ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाकचेरीवर गोंधळ घालून देशी दारुच्या दुकानासाठी मतदान नकोच, ते कायमस्वरुपी हद्दपार करण्याची मागणी जोरकसपणे मांडली.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासमोर महिलांनी तिव्र भावना व्यक्त केल्यात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात याविषयी तोडगा काढून निर्णय दिला जाईल, असे आश्वासित केले होते. मात्र गुरुवार उजाळताच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत नसल्याचे या महिलांच्या लक्षात येताच पाण्याच्या टाकीवर चढून पुन्हा आंदोलन सुरु केले. एकिकडे महिलांचे विरुगिरी आंदोलन सुरु असताना त्याचवेळी उच्च न्यायालयात परवाना धारकांनी याचिका मागे घेत हे देशी दारु विक्रीचे दुकान अन्य स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला. ही याचिका न्या. वासंती नाईक यांच्या पीठासीनासमोर निर्णयासाठी होती, हे विशेष. परवाना धारकांनी दारुच्या दुकानासंदर्भात याचिका मागे घेतल्याने जिल्हाप्रशासन, महापालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वडाळीतील देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हटविण्याच्या मागणीने प्रशासनाला हादरवून सोडले होते. अखेर महिलांच्या तिव्र आंदोलनामुळे दारु विक्रेत्यांना माघार घेण्याचा प्रसंग उद्भवला. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा लढा चालला. परंतु आंदोलक महिलांची एकी ही या लढ्याचे खरे यश मानले जात आहे. १० महिन्यांच्या लढ्यानंतर रणरागिणीच्या आंदोलनाला यश मिळाल्याने वडाळीतील देशी दारु विक्रीचे दुकान कधीही बंद होऊ शकत नाही, असे म्हणणाऱ्यांना तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे.
गुरूवारी एक वाजताच्या सुमारास आंदोलक महिला पाण्याच्या टाकीवर चढत असताना ‘करो या, मरो’च्या भूमिकेत असल्याचे दिसून आले. या आंदोलक महिलांचे मनोबल उंचावण्यासाठी वडाळीतील इतर महिलाही पुढे सरसावल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना महिला शक्तीच्या एकजुटीचे दर्शनही घेता आले.

Web Title: Ranaragani's fight was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.