रक्तरंजीत धूळवड
By Admin | Updated: March 8, 2015 00:10 IST2015-03-08T00:10:01+5:302015-03-08T00:10:01+5:30
होळीची कर म्हणजे धूळवड. पोलिसांच्या कडक बंदोबस्तानंतरही जिल्ह्यात ही धूळवड रक्तरंजीत ठरली.

रक्तरंजीत धूळवड
अमरावती : होळीची कर म्हणजे धूळवड. पोलिसांच्या कडक बंदोबस्तानंतरही जिल्ह्यात ही धूळवड रक्तरंजीत ठरली. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे धूळवडीच्या पूर्वसंध्येला म्हणजे ५ मार्च रोेजी सायंकाळी रखवालदार दाम्पत्याची विहिरीत फेकून हत्या करण्यात आली. अमरावती शहरातील माताखिडकी परिसरात करीच्या पार्टीच्या आयोजनावरून उद्भवलेल्या वादात सात-आठ जणांनी मिळून युवकाची निर्घृण हत्या केली. याशिवाय चिखलदरा तालुक्यातील पलस्या येथे रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरूवारी जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणात २ जण गंभीर जखमी झाले.
रखवालदार दाम्प्त्याची हत्या
बेलोरा : शेतातील गवत कापण्यास मनाई केल्याने उद््भवलेल्या वादात शेतातील रखवालदार दाम्पत्याला विहिरीत फेकून त्यांची हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत धुळवडीच्या पूर्वसंध्येला ५ मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. दुरखाशाह छगन धुर्वे (६५), प्रतिभा दुरखाशाह धुर्वे (५५ दोन्ही, रा. रेणुका खोक, जि. बैतुल, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
तर वासुदेव उईके, त्यांची पत्नी, संदीप उईके आणि त्याचा आणखी एक साथीदार (रा. पांढुर्णानजीक, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. शिरजगाव कसबा येथील शेतकरी रवी लाला यांच्या शेतात दुरखाशाह हे त्यांची पत्नी प्रतिभासह रखवालीचे काम करतात.
विहिरीत फेकून दिले
बेलोरा : आरोपी वासुदेव उईके, त्यांची पत्नी व संदीप धुर्वे आणि त्याचा साथीदार रवी लाला यांच्या काकाच्या शेतात सोकारी करतात. रवी लाला व त्यांच्या काकाचे शेत शेजारी-शेजारीच आहे. काही दिवसांपासून आरोपी वासुदेव उईके त्यांच्या पत्नी व साथीदारांसह रवी लाला यांच्या शेतात येऊन गवत कापून नेत आणि बाजारात विकत. दुरखाशाह यांनी वारंवार विरोध करूनही हा प्रकार थांबत नव्हता. घटनेच्या दिवशी देखील आरोपी ऊईके यांनी रवी लाला यांच्या शेतात घुसून गवत कापून नेले. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर वासुदेव उईके, त्यांची पत्नी, संदीप धुर्वे व त्यांच्या साथीदाराने धुर्वे दाम्पत्याला बेदम मारहाण करून शेतातील विहिरीत फेकून दिले.
दुसऱ्या दिवशी शेतमालक रवी लालो शेतात आले असता त्यांना रखवालदार दाम्पत्य त्यांच्या झोपडीत आढळून आले नाही. शोध घेतला असता दोघांचेही प्रेत शेतातील विहिरीत तरंगताना आढळले. गवत कापण्याच्या वादाबद्दल धुर्वे दाम्पत्याने यापूर्वी शेतमालक रवी लाला यांना सांगितले असल्याने त्यांनी लगेच शेजारच्या झोपडीत जाऊन पाहिले. परंतु तेथे कोणीही आढळले नाही. त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह बलदेव दुरखाशाह धुर्वे यांच्या स्वाधिन करण्यात आले. बलदेवच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदार चौगुले करीत आहेत. (वार्ताहर)
वाद सोडविणाऱ्या युवकावर हल्ला
अमरावती : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाला विट मारून जखमी करण्यात आल्याची घटना शुक्रवारी माताखिडकी परिसरात घडली. या प्रकरणी नितीन सज्जन तसरे (२३,रा. महाजनपुरा) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी गोपाल तायडे व बजरंग नावाच्या मुलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
‘कर’पार्टीच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या
अमरावती : होळीच्या करीसाठी पार्टीच्या तयारीवरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.०५ वाजता माताखिडकी चौकात घडली. विनोद नारायण बुंदेले (२८,रा.माताखिडकी) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे रंगपंचमी उत्सवाला गालबोट लागले.
विटांनी बेदम मारहाण
अमरावती : या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून खोलापुरी गेट पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक माता खिडकीजवळील भुलेश्वर मंदिर परिसरातील रहिवासी संजय लक्ष्मण तंवर (४०) व मृत विनोद बुंदेले दोघे मित्र होते. शुक्रवारी संजयचा कर पार्टीच्या आयोेजनावरून अन्य सात-आठ युवकांसोबत वाद झाला. विनोद बुंदेले याने मध्यस्ती करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद गोपाल तायडे, सुनील तायडे, बजरंग अडायगे, संतोष डोईफोडे, सोनू उर्फ सूरज डोईफोडे, आकाश डोईफोडे आणि सतीश डोईफोडे यांनी विनोदला लाथा-बुक्क्यांनी व विटांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनोदचा घटनास्थळी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विनला पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गोपाल प्रभाकर तायडे, बजरंग अडायगे, संतोष डोईफोडे, सोनू डोईफोडे, आकाश डोईफोडे व सतीश डोईफोडे या सहा आरोपींना शनिवारी पहाटे ५ वाजता अटक केली. मुख्य आरोपी सुनील प्रभाकर डोईफोडे व फारुख (हैदरपुरा) हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे व एसीपींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)