रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पाला लवकरच प्रारंभ
By Admin | Updated: September 5, 2016 00:19 IST2016-09-05T00:19:57+5:302016-09-05T00:19:57+5:30
बडनेरा रेल्वे वॅगन कारखान्याच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे मुख्य अभियंता भूषण पाटील यांनी जागेची पाहणी केली आहे.

रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पाला लवकरच प्रारंभ
खासदारांचा पाठपुरावा : झेडआरयूसीसीच्या बैठकीत गाजला मुद्दा
अमरावती : बडनेरा रेल्वे वॅगन कारखान्याच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे मुख्य अभियंता भूषण पाटील यांनी जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे काही वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. यापूर्वी खा.आनंदराव अडसूळ यांनी प्रक ल्पाचे काम त्वरित सुरु करावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे.
मुंबई येथे रेल्वेच्या विभागीय दक्षता समितीची बैठक शनिवारी पार पडली. यामध्ये झेडआरयूसीसीचे सदस्य सुनील भालेराव यांनी बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निर्मितीचे काम रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला.
यापूर्वी खा.अडसूळ यांनी रेल्वे मंत्रालय ते पटना येथे रेल्वे वर्कशॉप इंजिनियरिंग व मध्य रेल्वे महाप्रबंधक सीएसटी मुंबई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने उच्च न्यायालयात प्रबंधित असलेले विविध प्रकरण खारीज करण्यात आले. मध्य रेल्वेने वॅगन दुरुस्ती कारखान्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी सुनील भालेराव यांनी बैठकीत केली.
या मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या दोन्ही निविदा मंजूर केल्या असून इंजिनिअरिंग वर्कशेड व कंपाऊंड वॉलच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा हे येणार असल्याची माहिती देण्यात आली. झेडआरसीसीचे सदस्य सुनील भालेराव यांच्यासह मुख्य अभियंता वर्कशॉप विभाग मध्य रेल्वे मुंबई भूषण पाटील यांनी भुसावळ डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांसोबत अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनची पाहणी केली. वॅगन दुरुस्ती कारखान्याची जमिनीची पाहणी करून अधिकाऱ्यांना जमिनीचे सीमांकन तत्काळ करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी सुनील भालेराव व डी.आर.सी.सी.मेंबर प्रकाश मंजलवार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वागत केले आहे.
कोकण- नागपूर स्पेशल
ट्रेन नियमित सुरु करा
बडनेरा येथे थांबणारी १०८३ नागपूर-करमाली ही स्पेशल ट्रेन नियमित सुरू करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. १३ आॅगस्ट रोजी सुरू करण्यात आली होती. नागपूर-वर्धा, अमरावती येथून कोकणात व गोव्याकडे जाण्यासाठी एकही गाडी उपलब्ध नसल्याने या गाडीची मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वे बोर्डाकडे केलेली आहे. सदर गाडी नियमित सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्याकडून पाठविण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. दिवाळीदरम्यान स्पेशल ट्रेन नागपूर-पुणे सुरू करण्यात येणार असून त्यासोबतच नागपूर-रत्नागिरी-करमाली १०८३ सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. सदर रेल्वे गाडी नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली. यासोबत नरखेड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण डिसेंबर २०१६ अखेर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.