‘रघुवीर’च्या कचोरीत अळ्या !

By Admin | Updated: September 15, 2016 00:06 IST2016-09-15T00:06:54+5:302016-09-15T00:06:54+5:30

प्रत्येक शहराचा एक ट्रेडमार्क असतो. मग ती तेथील भाषाशैली असेल, एखादे पेय असेल किंवा एखादा खाद्यप्रकारही असू शकतो.

'Raghuveer''s larvae! | ‘रघुवीर’च्या कचोरीत अळ्या !

‘रघुवीर’च्या कचोरीत अळ्या !

एफडीएकडे तक्रार : हा तर गंभीर धोका !
अमरावती : प्रत्येक शहराचा एक ट्रेडमार्क असतो. मग ती तेथील भाषाशैली असेल, एखादे पेय असेल किंवा एखादा खाद्यप्रकारही असू शकतो. अंबानगरीचाही असाच एक ट्रेडमार्क आहे; तो म्हणजे येथील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानची कचोरी. बाहेरून येणारी व्यक्ती आवर्जुन या दोेन पदार्थांची चव चाखते. मात्र, एका ग्राहकाने मोठ्या विश्वासाने घरी नेलेल्या कचोरीमध्ये चक्क अळी आढळल्याने ‘रघुवीर’च्या विश्वासार्हतेवर आणि दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रघुवीरची कचोरी विश्वासाने खाणाऱ्यांच्या पोटात शुद्धच अन्न गेले काय? हा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे.
दर्जेदार नाश्ता हवा असला की स्थानिक लोक ‘रघुवीर’ला प्राधान्य देतात. परंतु दर्ज्याच्या नावावर इतरांपेक्षा अधिक मोबदला आकारणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानात ग्राहकांच्या पोटात जाणाऱ्या अन्ननिर्मितीदरम्यान किती काळजी घेतली जाते, हे या घटनेमुळे पुराव्यानिशी उघड झाले आहे.
शहरातील बुधवारा परिसरातील रहिवासी बंडू बाबरेकर यांनी शाम चौकातील रघुवीर प्रतिष्ठानातून कचोरीचे पार्सल घरी नेले. घरी गेल्यानंतर त्यांनी मुलीला कचोऱ्या दिल्यात. अर्धीअधिक कचोरी खाल्ल्यानंतर मुलीला चक्क त्यात बोटाच्या कांड्याच्या लांबीची अळी आढळून आली. लगेच तिने ही बाब वडिलांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने उरलेल्या कचोऱ्या ‘पॅक’ करून शाम चौकातील रघुवीर प्रतिष्ठान गाठले आणि संबंधितांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी चूक कबूल केली आणि बंडू बाबरेकर यांची माफीही मागितली. मात्र, कचोऱ्यांसाठी दिलेले पैसे त्यांनी परत केले नाहीत अथवा यापेक्षा अधिक गांभीर्याने दखल देखील घेतली नाही. रघुवीरचा नाश्ता म्हणजे शुद्धता आणि चवदारपणाची हमी, असे लोकांना वाटते. त्यामुळे येथील कचोरीमध्ये अळी सापडण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबीची दखल घेतली जावी, यासाठी याबाबीची तक्रार एफडीएकडे करण्याचा निर्णय बंडू बाबरेकर यांनी घेतला आहे.

नाश्त्याचे सर्वाधिक दर, तरीही अक्षम्य दुर्लक्ष
शहरातील बहुतांश खाद्यपदार्थ प्रतिष्ठानात कचोरी, समोसा व सांभारवडीचे दर रघुवीरमधील पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आहेत. रघुवीरमध्ये २५ रुपये प्रती प्लेटनुसार नाश्त्याचे दर आकारले जातात. मात्र, इतर ठिकाणी १५ ते २० रुपये प्रती प्लेटनुसार ग्राहकांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे शहरातील सर्वात महागड्या प्रतिष्ठानात रघुवीर गणले जाते. परंतु दर्जा राखतो, अशी जाहिरात केली जात असल्याने ग्राहक महागडे दर देऊनही खाद्यपदार्थ खरेदी करतात. तरीही कचोरीत सहज दिसू शकेल, इतक्या मोठ्या आकाराची अळी निघते. हा काय रघुवीरचा दर्जा? असा प्रश्न ग्राहकांचा आहे. रघुवीर प्रतिष्ठानाचे किचन किती दुर्लक्षित असू शकते, असा मुद्दा या घटनेतून अधोरेखित होतो. ग्राहकांच्या पैशातून ग्राहकांनाच अळ्या खाऊ घालण्याच्या या प्रकाराविरुद्ध कमालीचा संताप व्यक्त करण्यात आला.

शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री
रघुवीरसारख्या प्रतिष्ठित व विश्वासार्हतेची हमी देणाऱ्या प्रतिष्ठानातील पदार्थामध्ये जर चक्क अळी निघत असेल तर ही बाब अतिशय गंभीर ठरते. शहरात विविध ठिकाणी याच धर्तिवर सर्रास निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतोे. दूषित पाण्याचा वापर, स्वच्छतेबाबत उपाययोजना नसणे आदी प्रकार उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे फारसे लक्ष नाही. यातून एखादी मोठी घटना घडल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

‘किचन’ रूममध्ये स्वच्छता गरजेची
खाद्यपदार्थांमध्ये अळी निघणे हा प्रकार गंभीर आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास असे प्रकार घडू शकतात. अळी खाण्यात गेल्याने आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम जरी संभवत नसला तरी उलट्या होण्याची शक्यता असते. इतरही संक्रमण होवू शकते. किळसवाणे वाटल्याने मळमळ सुरू होते. रघुवीरच्या कचोरीत निघालेली अळी नेमकी कोणत्या प्रकारात मोडते, हे स्पष्ट झाल्यास ती आरोग्यास किती हानीकारक आहे, हे ठरविता येईल, असे मत डॉ. रक्षा चौधरी व डॉ.राजुल देशमुख, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. अंजली देशमुख, दिप्ती दुधाट, डॉ. अंजली सवाई यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.

Web Title: 'Raghuveer''s larvae!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.