२७६ ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: July 9, 2017 00:09 IST2017-07-09T00:09:27+5:302017-07-09T00:09:27+5:30
जिल्ह्यात आॅक्टोबर २०१७ ते फेब्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७६ ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला.

२७६ ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
आयोगाचे आदेश : २१ आॅगस्टला होणार अंतिम यादी प्रसिद्व
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आॅक्टोबर २०१७ ते फेब्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७६ ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार आठ आॅगस्टला प्रारूप यादीची व २१ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्व करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर महिण्यात होण्याची शक्यता आहे.
या सर्व ग्रामपंचायतींची प्रभाग रचनेची प्रक्रिया ३ आॅगस्टला पूर्ण होणार आहे.त्यानंतर ८ आॅगस्टला प्रारूप प्रभागरचना प्रसिद्व होईल.यावर हरकती व सूचना १४ आॅगस्टपर्यत दाखल करता येईल. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी व २१ आॅगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्व होईल. मतदारयादीचा संपूर्ण कार्यक्रम संगणकीय आज्ञावलीनुसार करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करतांना संबंधित ग्रामपंचायतीत समाविष्ट एकुण मतदारांची संख्या आणि त्या ग्र्रामपंचायतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीमधील मतदारांची संख्या समान राहणार आहे. या यादीत दुबार नोंदणी झालेल्या नावांबाबत आयोगाचे निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
प्राप्त हरकती व सुचनेनुसार यादीमधील लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नावे असूनही ग्रामपंचायतीच्या संबधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी ग्रामपंचायत,तलाठी सज्जा, मंडळ अधिकारी पंचायत समिती व तहसील कार्यालयांच्या सुचना फलकावर लावण्यात येणार आहे. आरक्षण जाहीर झाल्याने गावागावात ग्रामपंचायतीच्या राजकारणाने वेग घेतला असून गावपुढारी कामाला लागले आहेत.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
आयोगाने जाहीर केलेला मतदार यादीचा कार्यक्रम जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.यामध्ये अमरावती, भातकुली व तिवसा तालुक्यात प्रत्येकी १२ ग्रामपंचायती,चांदूर रेल्वे १९, धामणगाव रेल्वे ७, नांदगाव खंडेश्वर १७, दर्यापूर २४, अंजनगाव सुर्जी १५, अचलपूर २७, चांदूरबाजार २५, मोर्शी २८, वरूड २३, धारणी २६ व चिखलदरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.