चांदूर शहराच्या समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात
By Admin | Updated: September 23, 2016 00:16 IST2016-09-23T00:16:56+5:302016-09-23T00:16:56+5:30
चांदूररेल्वे शहरातील प्रभाग १ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. खडकपुऱ्यातील मुख्य नाला घाण, गाळाने व झुडूपाने बुजले आहे.

चांदूर शहराच्या समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात
ओबीसी घरकुलापासून वंचित : सत्याग्रह युवा मंचचे निवेदन, प्रसाधनगृहाचीही मागणी
चांदूररेल्वे : चांदूररेल्वे शहरातील प्रभाग १ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. खडकपुऱ्यातील मुख्य नाला घाण, गाळाने व झुडूपाने बुजले आहे. या प्रभागातील पात्र ओबीसींना अद्यापपर्यंत घरकूल मिळालेले नाही. जुना मोटर स्टँड चौक व विरूळ चौकात प्रवासी निवारा त्वरित बांधा. या व अन्य मागण्यांचे निवेदन सत्याग्रह युवा मंचचे अध्यक्ष रूपेश पुडके यांच्या नेतृत्वात नागरिकांनी मुख्याधिकारी यांना दिले.
चांदूररेल्वे शहरातील प्रभाग १ दाट लोकवस्ती प्रभाग आहे. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा भरणा जास्त आहे. या प्रभागात खडकपुरा येथून नाला वाहतो. हा नाला घाणीने व गाळाने भरलेला असून अनेक काटेरी झुडपे निघाली आहेत. त्यामुळे तिथे घाणीचे साम्रज्य झाले असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासह अन्य संसर्गजन्य आजाराचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे या नाल्याची त्वरित स्वच्छता करावी. या प्रभागातील अनेक पात्र ओबीसींना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्यांना त्वरित घरकूल देण्यात यावे, शहरातील जुना मोटर स्टँड व विरूळ चौकात बस थांबा आहे. परंतु येथे प्रवासी निवारा नसल्याने शेकडोंना उन्ह, वारा, पावसात बसची ताटकळत वाट पाहावी लागते. त्यामुळे या ठिकाणी त्वरीत बस निवारा उभारावा, चांदूररेल्वे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील अनेक गावकरी विविध कामासाठी दररोज चांदूररेल्वे शहरात येतात. परंतु शहरातील सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह गलिच्छ व घाणीने भरलेले आहेत. ते त्वरित स्वच्छ करण्यात यावेत.
चांदूररेल्वे शहरातील रहिवासी असलेल्या अनेक शेतकऱ्यांची शेती ग्रामीण भागात आहेत. अशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत जॉबकार्ड मिळालेले नाहीत. त्यांना त्वरित जॉब कार्ड द्यावे या मागणीचे निवेदन सत्याग्रह युवा मंचच्यावतीने चांदूररेल्वे मुख्याधिकारी व आ. वीरेंद्र जगताप यांना देण्यात आले.
यापूर्वी अनेकदा या प्रभागातील समस्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या समस्या आता तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी शहरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली.
निवेदन देताना सत्याग्रह युवा मंचचे अध्यक्ष रूपेश पुडके, जी. एम. बोरडे, आकाश हारगुडे, एच. ए. पारगांवकर, शुभम इंगळे, अक्षय ठाकुर, स्वप्निल शिंगणजुडे, धिरज कलावटे, पवन कानतोडे, गोपीचंद प्रेमसुरे, नीलेश टाके, अंकुश निमजे, प्रवीण शिवणकर, भीमराव बागडे, अश्विन पाटणे, विजय सातपुते यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)