कारागृहात वीज,पाणी बचतीचा संकल्प
By Admin | Updated: September 22, 2016 00:24 IST2016-09-22T00:24:38+5:302016-09-22T00:24:38+5:30
हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात ...

कारागृहात वीज,पाणी बचतीचा संकल्प
अधीक्षक दालनात बैठक : बराक प्रमुखांनी स्वीकारली जबाबदारी
अमरावती : हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात आता वीज, पाणी बचतीचा संकल्प सोडला आहे. कारागृह अधीक्षक दालनात झालेल्या बैठकीत सर्व बॅरेक प्रमुखांनी वीज, पाणी बचत करण्याची शपथ घेतली.
कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने कैद्यांसाठी सुधारणा व पुनर्वसन विविध उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमांमुळे बंदीजनांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण होऊन समाज निर्मितीसाठी काही तरी वेगळे करण्याची उमेद जागे झाले आहे. परिणामी कारागृह अधीक्षकांनी अनावश्यक वीज, पाणी वापर टाळण्यासाठी बंदीजनांनी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव ठेवला असता त्याला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. बॅरेक अथवा कारागृह परिसरात अनावश्यक वीज, पाणी वापर टाळून राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करण्याची शपथ बंदीजनांनी घेतली. उर्जा बचतीसाठी बॅरेक जबाबदारांनी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संजय धुर्वे, संतोष नरोटे, अशोक इंगळे, रवि रोकङे,कृष्णा नरोटे, राजू पवार, रमेश गोंडाने, श्रीकृष्ण बंधे, राजू देवडे, सुरेश घुलक्षे, जगदेव मोरे, संजय वर, संजय मोरे, मोतीराम लठाड या बॅरेक प्रमुख तसेच जनरल सुभेदार विक्रम तिवसकर, रक्षक सुरेश गुळवे यांनी उर्जा, पाणी बचतीचा संकल्प घेतला. कारागृह अधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली तर बराकीत अनावश्यक वीज, पाणी वापर दिसणार नाही, अशी सामुहिकपणे शपथ घेण्यात आली. या नवीन उपक्रमामुळे कारागृहात ३० टक्के वीज, पाण्याची बचत होईल, असा दावा बॅरेक प्रमुखांनी कारागृह अधीक्षक ढोले यांना दिला. शासन तिजोरीवर पडणारा भार देखील कमी होईल. पर्यावरणाच्या अनुषंगाने वीज, पाणी बचत ही भविष्यासाठी अतिशय आवश्यक बाब असल्याने कारागृहात सुरु झालेल्या या उपक्रमामुळे कारागृह खरेच बंदीशाळा म्हणून नावारुपास येत असल्याचे चित्र आहे.
कैद्यांनाही त्यांच्या जबाबदारीचे भान देणारा हा उपक्रम आहे. राष्ट्राच्या प्रगतीकरिता वीज आणि पाण्याची बचत अनिवार्य ठरते. कैद्यांनी वीज आणि पाणी बचतीची शपथ घेतल्याने या उपक्रमाची जोरदार चर्चा होती. कारागृहात हा उपक्रम राबविला जात असल्याने याबद्दल बरीच उत्सुकता आहे. पाण्याचा अनावश्यक वापर व विजेचा अपव्यय टाळल्यास उद्या या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी वणवण भटकण्याची वेळ येणार नाही, असा सूर उमटला
राष्ट्रनिर्मितीत सगळ्यांचाच सहभाग आवश्यक आहे. वीज, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा वापर योग्य रुपात व्हावा, ही भावना आहे. बंदीजनांना वीज, पाण्याचे महत्त्व पटवून दिले. १४ वॉर्डन, वॉचमन यांच्यावर ११०९ बंदीजन सांभाळण्याची जबाबदारी असताना वीज, पाण्याची बचत देखील करावी लागणार आहे.
- भाईदास ढोले
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह