अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत
By Admin | Updated: October 13, 2016 00:34 IST2016-10-13T00:34:54+5:302016-10-13T00:34:54+5:30
नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत
राजकारण गतीमान : पक्ष नेतृत्वाला पडलाय पेच
चेतन घोगरे अंजनगाव सुर्जी
नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. देवी पावली, असा भास त्यांना होत आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येणार असल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
अनेकदा विशिष्ट प्रवर्गासाठी अध्यक्षपद आरक्षित झाल्यावर तीव्र इच्छा असूनही अनेकांना निवडणूक लढता येत नाही. पण नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्यामुळे ही संधी आपल्यालाच मिळावी, यासाठी अनेकजण सक्रिय झाले आहेत. राजकीय पक्ष व इच्छुकांकडून नव्या समीकरणाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांनंतर थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात नाही तर इतर वेळेसही जास्तीत जास्त चांगला जनसंपर्क ठेवणाऱ्या उमेदवाराला फायदा होणार आहे. यातच इच्छुकांची वाढती संख्या पाहता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे पुन्हा एकदा आपली ताकद आजमावतात की एकमेकांशी हातमिळवणी करून निवडणुकीला समोर जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
५ आॅक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यातच सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद निघाल्याचे कळताच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासह सर्वांच्या आनंदाला उधान आले. सध्या नवरात्रीची धामधूम सुरू असून कोणीही अन्य विषयावर बोलताना दिसून येत नाही. त्यामुळे आता सामना चांगलाच रंगणार, हेच वाक्य सर्वांच्या तोंडातून निघत आहे. काही माजी, तर काही विद्यमान सदस्यांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्याने याशिवाय आता सर्वांनाच रान मोकळे असल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. आता राष्ट्रीय पक्षाकडून कुणाला तिकीट मिळते, कुणाला अपक्ष मैदानात उतरावे लागते, यावरही बरीच गणिते अवलंबून राहणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी फोडले फटाके
अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरात काही इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आता ही निवडणूक सर्वांसाठी मोकळी झाली. तेव्हा आता कुणीही रिंगणात उतरू शकणार असल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व्यक्त केला.
सन २००२ नंतर दुसऱ्यांदा प्रयोग
नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा हा प्रयोग यापूर्वी सन २००२ मध्ये करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे कमलकांत लाडोळे हे जनतेतून निवडून आले होते. आता सुद्धा जनतेतूनच त्यांच्या नावाची चर्चा जोरात असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा त्यांनाच लॉटरी लागेल काय, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.