‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:07+5:302021-03-04T04:22:07+5:30
राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी ...

‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती!
राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी केवळ दहा जणांना परवानगीची मर्यादा आली. त्यामुळे जे विवाह सोहळे नियोजित होते, ते काहीशा नाराजीने पार पडत असले, तरी हौसमौजेला मर्यादा आल्याने अनेक लग्नाळूंनी ‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती दिली आहे.
आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नाच्या प्रसंगी गणगोताची सरबराई, आनंदाची उधळण, डोळे दीपवणारी रोशणाई, फटाके, वाजंत्री, आतशबाजी, नवीन कपडे न भरपूर एन्जॉयमेंट. मात्र त्यात? आनंदावर कोरोनाने विरजण घातले. म्हणे काय? तर वधू-वरांसह केवळ १० लोकांमध्ये लग्न करा. शक्य आहे का? अजिबात नाही. वधू-वर सोडून केवळ आठ लोक. कोण घ्यायचे त्यात? मुलामुलींचे आईवडील झाले चार. मुलामुलींचे मामा झाले एकूण सहा, भटजी सातवा अन् एखादी करवली. मामा, मावशी, आत्या, काका, भाऊ, बहिणी, आजोबा, आजी या आप्तांचे काय? त्यामुळे यंदा कर्तव्याला टांग दिलेलीच बरी! असा विचार करून अनेक विवाहेच्छुक उपवर वधू लग्न पुढे ढकलत आहेत.
या पंधरवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासनाने खबरदारी म्हणून परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यांत अडचणी आल्या आहेत. तर ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. ज्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची संपूर्ण तयारी झाली आहे अशा वधू-वरांकडील मंडळी ऐनवेळेवर लागलेल्या बंदीने चिंतित आहेत. ग्रामीण भागात पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर लग्न समारंभामध्ये गर्दी होऊ नये, याची जबाबदारी दिली आहे.
मंगल कार्यालयाकडून अॅडव्हान्स परत
दोन-तीन महिन्यांपूर्वी जी लग्ने निश्चित झालीत, त्यांचे विवाहस्थळ म्हणून जी मंगल कार्यालये ठरविण्यात आली, त्यांनी कारवाईचा बडगा नको, म्हणून वधू-वर पक्षांकडून घेतलेली अॅडव्हान्सची रक्कम परत करण्याची घाई चालविली आहे. १० व्यक्तींमध्येच विवाह आटोपायचा आहे, तर लोक वधूच्या घरी लग्न करण्यास पसंती देत आहेत. अनेकांनी लग्नानंतरचे रिसेप्शनदेखील रद्द केले आहे.