शहरातील शाळांचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकाऱ्यांच्याच ताब्यात
By Admin | Updated: May 9, 2014 01:41 IST2014-05-09T00:59:30+5:302014-05-09T01:41:21+5:30
जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांऐवजी महापालिका..

शहरातील शाळांचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकाऱ्यांच्याच ताब्यात
अमरावती : जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांऐवजी महापालिका क्षेत्रातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार पालिका आयुक्तांना शासनाने बहाल केले आहे. मात्र अद्यापही शहरी भागातील शाळांवर नियंत्रण ठेवण्याचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकारी यांच्याच ताब्यात असल्याने या शाळांवर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्या जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये आदी शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा शाळांचे हस्तांतरण शिक्षण विभागाने महानगर पालिकाकडे केले आहे.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार ही सोपस्काराची कारवाई पूर्ण झाली असताना यासोबतच शासनाने काढलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोडणार्या सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्याऐवजी महापालिका आयुक्तांकडे सोपविण्याचे स्पष्ट निर्देशही याच आदेशात देण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या शहरातील शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत, त्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याच्या अधिकारांचे अधिकार पत्रच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिका आयुक्तांना दिलेले नाही. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार शिक्षणाधिकारी यांनी स्वत:कडे राखून ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडे आधीची होती तेवढी जबाबदारी असल्याने कमी होणारा शिक्षण विभागाचा प्रशासकीय ताण कायम आहे. त्यामुळे अद्यापही शिक्षण विभागाची पूर्वीप्रमाणेच कामाची तारांबळ कायम आहे.
परिणामी शहरी भागातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिल्यास ग्रामीण भागातील शाळांवर योग्यरित्या नियंत्रण ठेवून शिक्षण विभागाला प्रशासकीय कामातील गती वाढविणे सोपे होऊ शकते; मात्र शिक्षणाधिकारी हे आपल्याकडील नियंत्रणाचा वाढलेला भार केव्हा कमी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत महापालिका क्षेत्रात येणार्या शाळा हस्तांतरणाची कार्यवाही केली आहे; मात्र यावर नियंत्रण ठेवण्याबाबत अद्याप तरी पत्र शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही.
- सविता चक्रपाणी, शिक्षणाधिकारी महापालिका, अमरावती