जिल्ह्यात पोलिसांना हवे रेकॉर्डवरील १७८ गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:25+5:302021-02-05T05:27:25+5:30
संदीप मानकर /अमरावती : विविध प्रकारचे एकापेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून अद्यापही फरार असलेल्या जिल्ह्यातील १७८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा ...

जिल्ह्यात पोलिसांना हवे रेकॉर्डवरील १७८ गुन्हेगार
संदीप मानकर /अमरावती : विविध प्रकारचे एकापेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून अद्यापही फरार असलेल्या जिल्ह्यातील १७८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात यावर्षी अचलपूर शहरातून गुन्हेगारी पार्शवभूमीच्या एका युवकाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून तुकडे करून मध्यप्रदेशातील नदीत फेकले होते. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जिल्ह्यात खूनाच्या ८८ घटना घडल्या. यापैकी ८४ खुनाच्या घटना उघड करून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. खुनाच्या घटना जरी जिल्ह्यात घडल्या असल्या तरी संघटित गुन्हेगारीत मात्र, घट झाली आहे. ग्रामीण भागात गतवर्षी दोनच घटना संघटित गुन्हेगारीतून घडल्याचे पुढे आले. खुनाच्या २४ घटना शहर हद्दीत, तर ६४ घटना ग्रामीण भागात घडल्या होत्या. जिल्ह्यात खुनाचा प्रयत्नाच्या १०६, बलात्कार १९०, जबरी चोरीच्या ७३ घटना घडल्या. यापैकी ७० घटना शहर हद्दीतील आहेत. घडफोडीच्या ३५७ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यापैकी १२२ घटना उघडकीस आल्या. घरफोडीतील चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
१) दाखल गंभीर गुन्हे- ४५७
२) फरार असलेले गुन्हेगार-१७८
बॉक्स
वर्षभरात केले १२४ आरोपी तडीपार
वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व ज्या आरोपींमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते अशा १२४ जणांना जिल्ह्यातून पोलिसांनी तडीपार केले होते. त्यात सर्वाधिक १०७ तडीपार शहर हद्दीत, तर १७ तडीपार ग्रामीण पोलिसांनी घोषित केले होते. तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील ८१ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
बॉक्स:
गुंड प्रवृत्तीतून दोन हत्या
ग्रामीण भागातील अचलपूरातून एका संघटित गुन्हेगारीतून ३ डिसेंबर रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोघांनी गुंड प्रवृत्तीच्या एका युवकाची हत्या केली. त्याचा मृतदेह जाळून तुकडे करून ते मध्यप्रदेशातील मेघा नदीत फेकले होते. दुसरी घटना तिवसा येथे ९ ऑगस्ट रोजी घडली होती. १४ जणांनी एका युवकाच्या घरात घुसून चाकूने भोसकले होते. शहरात एका दीड महिन्याच्या चिमुकल्याला विहिरीत टाकल्याची घटना घडली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी त्याच्या आईला अटक केली होती. मात्र, या गुन्ह्याची अद्याप कबुली मिळाली नसल्याने हा गुन्हा उघड होऊ शकला नाही.
कोट
विविध गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेले रेकॉर्डवरील आरोपींची पथकाव्दारे शोधमोहीम सुरूच आहे. दर दोन ते तीन महिन्यांतून यासंदर्भात आढावासुद्धा घेण्यात येत आहे. गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
- हरीबालाजी एन. जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती