पोलीस यंत्रणा बळकटीकरणासह दर्जेदार सुविधा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:22+5:302021-06-28T04:10:22+5:30
पालकमंत्री यांचे प्रतिपादन, चिखलदऱ्यात नवीन पोलीस विश्रामगृहाचा शुभारंभ अमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत ...

पोलीस यंत्रणा बळकटीकरणासह दर्जेदार सुविधा देणार
पालकमंत्री यांचे प्रतिपादन, चिखलदऱ्यात नवीन पोलीस विश्रामगृहाचा शुभारंभ
अमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या व आताही पार पाडत आहेत. पोलीस दलाचे अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी चिखलदरा येथे केले.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा येथील हिरेकन पॉईंट येथे उभारण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प. समाज कल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया सोमवंशी, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तहसीलदार माया माने, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाढवे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुल, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यालाच जोडून चिखलदरा येथील विश्रामगृहाचीही दर्जेदार सुविधा निर्माण झाली आहे. चिखलदऱ्याच्या लौकिकाला साजेशी, अशी ही निर्मिती आहे. पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या, हे निश्चित वाखाणण्याजोगे आहे. यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबविला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांच्या आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी असे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलीस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. श्वेता बालाजी यांनी त्यांच्या कल्पकता व उत्तम नियोजनातून येथील विश्रामगृहात सुविधांचे सौंदर्यीकरण करून त्यांचा दर्जा उंचावला, असे त्यांनी सांगितले. यावेळी चिखलदरा उभारण्यात येणाऱ्या ‘स्काय वॉक’ची पाहणी पालकमंत्री यांच्याद्वारे करण्यात आली.