आता वरातीसाठीही लागणार पोलीस परवानगी
By Admin | Updated: May 31, 2015 00:20 IST2015-05-31T00:20:13+5:302015-05-31T00:20:13+5:30
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लग्नसमांरभातील वरातींमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण ...

आता वरातीसाठीही लागणार पोलीस परवानगी
पोलीस उपायुक्त काढणार सूचना : शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे निर्णय
अमरावती : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लग्नसमांरभातील वरातींमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याकरिता आता नवरदेवाची वरात काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस उपायुक्त बी.के.गावराने तशा सूचना निर्गमित करणार आहेत.
लग्न हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्यामुळे सर्वांसाठीच तो उत्साहपूर्ण व आनंदादायी असतो. उन्हाळ्यात लग्नतिथी अधिक असतात. परंतु अलिकडे मुहूर्त न पाहता लग्न करण्याची प्रथा रूढ होत असल्याने वर्षभर कुठे ना कुठे लग्नाचा बॅन्डबाजा वाजताना आढळून येतो. लग्नसमारंभ म्हटला की, डीजे, बॅन्ड व आतषबाजी आलीच. उत्साहाला उधाण येते. शहरातील बहुतांश मंगल कार्यालयात दररोज शेकडो लग्नसमांरभ पार पडत आहेत. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते.
लग्नाच्या वरातीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरून वरात काढणाऱ्यांना पोलीस परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. तशा सूचना नागरिकांना देण्यात येतील. वाहतुकीची कोंडी निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत.
-बी.के.गावराने,
पोलीस उपायुक्त.