सोने विक्रीत लूट
By Admin | Updated: May 24, 2014 23:10 IST2014-05-24T23:10:43+5:302014-05-24T23:10:43+5:30
येथील सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव घसरले असले तरी येथे मुंबई बाजाराच्या तुलनेत प्रतितोळा एक हजार रूपये इतक्या अधिक दराने सोने विकून ग्राहकांची लूट केली जात आहे.

सोने विक्रीत लूट
तयार दागिन्यात २५ टक्के डाग : मुंबईच्या तुलनेत तोळ्यामागे हजाराचा फरक गणेश वासनिक - अमरावती येथील सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव घसरले असले तरी येथे मुंबई बाजाराच्या तुलनेत प्रतितोळा एक हजार रूपये इतक्या अधिक दराने सोने विकून ग्राहकांची लूट केली जात आहे. शनिवारी मुंबई बाजारात सोने प्रतितोळा २७ हजार ४५0 रूपये तर अमरावतीत २८ हजार १५0 रूपये दराने सोने विकले गेले. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोने आयातीवरील निर्बंध शिथिल केल्याचा सराफा बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याचे समजताच सामान्य ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला प्राधान्य दिले. मात्र, सराफा बाजारात तोळय़ामागे एक हजार रुपये अधिक मोजून सोने खरेदी करावे लागले, हे विशेष. ज्या ग्राहकांनी तयार दागिने खरेदी केले त्यांना २५ टक्के डागी दागिने घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबई बाजाराच्या तुलनेत सोने सर्वसाधारणपणे प्रतितोळा २00 रूपये अधिक दराने विकले जाते. मात्र, ते चक्क एक हजार रूपये अधिक दराने विकण्याचा घाट येथील सराफा व्यावसायिकांनी रचल्याचे दिसते. ही शुद्ध फसवणूक असल्याचे बोलले जात आहे. पाच दिवसांपूर्वी ३0 हजार रूपये प्रतितोळा विकले गेलेले सोने अचानक २८ हजार रूपयांवर पोहोचल्याने सराफा व्यावसायिकही अंचबित झाले आहेत. खर्या अर्थाने सोन्याचे भाव सोमवारी २६ मे रोजी निश्चित होतील, अशी माहिती एका सराफा व्यावसायिकाने दिली. हल्ली सोन्याच्या दरात अस्थिरता असल्याने मोठय़ा फेरबदलाचे संकेत आहेत. सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे काही व्यावसायिकांनी केवळ सोन्याची बुकिंग करून घेतली. ग्राहकांना दागिने किंवा सोने देण्याचे टाळले. पुढील आठवड्यात सोन्याचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत. सोने विक्रीतून दरदिवसाला तीन कोटींची उलाढाल ! सोने व्यवसायात मुंबई नंतर अमरावतीत मोठी उलाढाल होत असल्याची माहिती आहे. येथूनच विदर्भ, मध्य प्रदेशात सोने पाठविले जाते. येथील काही सराफा व्यावसायिकांचे मुंबईत कनेक्शन असल्याने बसल्या जागी ते कोट्यवधी रूपयांची उलाढाल या व्यवसायात करीत असल्याचे बोलले जाते. अमरावती येथून दरदिवसाला पाच ते सात किलो सोने विक्रीतून तीन कोटींपर्यत उलाढाल होत असल्याचे सूत्राकडून समजते.