शिक्षण क्षेत्रासाठी सुखद वार्ता; सहा दिवसांत एकही विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:54+5:302021-02-05T05:27:54+5:30
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १,८२,४८७ पैकी ७३,८१६ विद्यार्थ्यांनी ...

शिक्षण क्षेत्रासाठी सुखद वार्ता; सहा दिवसांत एकही विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ नाही
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १,८२,४८७ पैकी ७३,८१६ विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थिती नोंदविली. कोरोना विषाणूचा आलेख कमी- जास्त होत असताना गत सहा दिवसांत एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी सुखद वार्ता मानली जात आहे.
राज्य शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. असे असले तरी शिक्षणाची दारी खुली करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण वर्गात सुरू झाल्याने विद्यार्थ्याना मोठा दिलासा मानला जात आहे. विज्ञान, गणित, इंग्रजी विषयाच्या शिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहे. मात्र, पाचवी ते आठवीचे विद्यार्थी घरीच लॉकडाऊन होते. ऑनलाईन शिक्षण घेत असताना आता शाळांमध्ये ऑफलाईन देण्यात येत आहे. तरीही कोरोनाची दहशत कायम आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. परिणामी तूर्त काही पालकांनी अद्यापही मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या ७५,१०१ पालकांनी अद्यापही संमतिपत्र शाळांना लिहून दिले नाही. एकूणच परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू होऊन सहा दिवसांचा कालावधी झाला असताना एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभाग, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
------------------
थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणीला प्राधान्य
शाळेच्या प्रवेशद्धारावरच विद्यार्थ्यांची दरदिवशी थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. त्याकरिता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर असेल, असे वर्गात नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यत शाळेत एकाही विद्यार्थ्याला ताप आला म्हणून घरी परत पाठविले नाही अथवा कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत, असे उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
----------------
पाचवी ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
अचलपूर- ४३०१
अमरावती- ५८६२
अंजनगावसुर्जी- ३७५४
भातकुली- २४५९
चांदूरबाजार- ८७८०
चिखलदरा- ४८१२
चांदूर रेल्वे- २६७३
दर्यापूर- ४५४६
धारणी- ४२१३
धामणगाव रेल्वे- ३२०४
मोर्शी- ४४४६
नांदगाव खंडेश्वर- ४०९१
तिवसा- २७६२
वरुड- ६७१३
अमरावती महापालिका- ११,२००
--------------
५८ शिक्षक आढळले संक्रमित
जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे १९९४ वर्ग आहेत. एकूण ७३१८ शिक्षकांकडे या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी आहे. २३ ते २५ जानेवारी दरम्यान ५३५४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५८ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.