पीआय आकोटकर, एएसआय देशमुखसह दोन पोलिसांचे निलंबन
By Admin | Updated: May 25, 2017 00:04 IST2017-05-25T00:04:45+5:302017-05-25T00:04:45+5:30
नाकाबंदीदरम्यान गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ..

पीआय आकोटकर, एएसआय देशमुखसह दोन पोलिसांचे निलंबन
पोलीस आयुक्तांची कारवाई : गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नाकाबंदीदरम्यान गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक पी.एस.आकोटकर, एएसआय विकास देशमुख, हवालदार प्रभाकर झगडे व अमोल देशमुख यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मंगळवारी रात्री १०.३० वाजता निलंबनाचे आदेश दिलेत.
गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. मात्र, जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोे. याकायद्याची १०० टक्के अमंलबजावणी होण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त मंडलिक यांनी शहरात येणाऱ्या चार महत्त्वाच्या मार्गावर ‘नाकाबंदी पॉइंट’ लावले आहेत. तसेच वेळोवेळी कोम्बिंग आॅपरेशन राबविले. असे असतानाही मंगळवारी जनावरे वाहून नेणारा ट्रक शहरात शिरला आणि त्या ट्रकने नवसारी चौफुलीवरील राजपुत धाब्याजवळ सुमोला धडक दिली. याअपघातानंतर शहरातही बेधडक गोवंश वाहतूक सुरु असल्याचे उघड झाले.
या ट्रकमध्ये ४० जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेली जात होती. त्यातील एका गोऱ्ह्याचा मृत्युदेखील झाला.
हा ट्रक नांदगाव पेठ टोलनाका ओलांडून शहरात आला. टोलनाक्यावर गोवंश नाकाबंदी पॉइंट असून तेथे पोलीस तैनात होते.
आकोटकर नियंत्रण कक्षात
अमरावती : यामार्गाने शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याची जबाबदारी नाकाबंदी पॉइंटवर तैनात पोलिसांची होती. मात्र,पोलीस निरीक्षक आकोटकर, एएसआय विकास देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी अमोल देशमुख व प्रभाकर झगडे यांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी केली नाही. त्यामुळे तो ट्रक मध्यप्रदेशातून नांदगाव पेठ टोलनाक्यावरून रहाटगांव रिंग्ांरोड मार्गे राजपुत धाब्यानजीक पोहोचला. तेथेच हा अपघात घडल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेऊन पोलीस आयुक्तांनी पीआय आकोटकर यांच्यासह एएसआय देशमुख व दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. निलंबन कालावधीत आकोटकर हे नियंत्रण कक्षात व उर्वरित पोलिसांना मुख्यालयात राहण्याचे आदेश दिले आहेत.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या काटकोर अमंलबजावणीच्या सूचना देऊनही नांदगाव पेठ टोलनाक्यावर तैनात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना निलंबित केले.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.