तुरीच्या डाळीने गाठला उच्चांक
By Admin | Updated: May 14, 2015 00:06 IST2015-05-14T00:06:37+5:302015-05-14T00:06:37+5:30
पाच वर्षांत ज्वारीचे दर वाढल्यामुळे भाकरी केव्हाच महागली आहे. आता तूर डाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे.

तुरीच्या डाळीने गाठला उच्चांक
दरवाढीने सामान्य नागरिक हैराण : वरण-भाकरीची चव झाली अवघड
जितेंद्र दखने अमरावती
पाच वर्षांत ज्वारीचे दर वाढल्यामुळे भाकरी केव्हाच महागली आहे. आता तूर डाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे. बाजारपेठेत केवळ चार दिवसांपूर्वी ८० रुपये किलोने मिळणारी तूरडाळ चक्क किरकोळ दुकानात १०० ते १२० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे आता गरिबांचे वरणही महागले आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढच होत आहे.
उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे भाजीपालाही खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ४० रुपयांनी मिळणारा शेवगा ६० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहेत. तीच गत वांगी, दोडके, वाटाणा अशा सर्वच भाज्यांची झाली आहे. पालेभाज्या तर उन्हाळ्याच्या तोंडावर महाग झाल्या होत्या. आता तर १० ते १५ रुपयांच्याखाली कोणतीही पालेभाजी मिळत नाही.
ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागासाठी प्रत्येक कुटुंबात भाजीपाल्याला पूरक म्हणून आणि आवश्यक म्हणून विविध डाळींचा वापर केला जातो. वरण, भाकर तर गरिबांचे जेवण समजले जाते. मात्र या वरणाच्या सर्वच डाळींचे दर मागील तीन चार दिवसांत कडाडले आहेत. जिल्हाभरात विविध भागांतून डाळी येतात. तुरडाळ पश्चिम महाराष्ट्रातून तर हरभरा डाळ बहुतांश इंदूर येथून येते. त्या भागात डाळीचे उत्पन्न घटल्याने त्याचा परिणाम झाल्याचे मापारी सांगत आहेत. त्यामुळे या डाळीचे दर वाढले असून त्याची आवकही पुरेशी कमी आहे. डाळीचे दर झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्राहक किराणा दुकानात डाळीचे दर ऐकताच निराश होत आहेत.
प्रत्येक कुटुंबात महिन्यात किमान २ किलो तरी एक दोन प्रकारच्या डाळी वापरल्या जातात. कढीपत्ता घालून फोडणी दिलेले तुरीच्या डाळीचे वरण सर्वांच्याच आवडीचे असते. मात्र ही आमटीही महाग झाली आहे. मात्र पावभर डाळ आणली तर किमान दोन - तीन वेळ पुरते. हे महिलांचे स्वयंपाकगृहातील गणित आहे. पण आता दरामुळे हे गणित बिघडून गेलेले आहेत.
प्रत्येक कुटुंबात कमी जास्त प्रमाणात डाळीचा वापर अनिवार्य असतो. डाळीचे वाढलेले दर सर्वच महिलांना त्रासदायक ठरणार आहे. वाढलेले दर पुन्हा कधी कमी होत नाहीत, हे आणखी वाईट.
-प्रभा मानकर,
गृहिणी