पितृछत्र हरविलेल्या ढोक कुटुंबाला दिला आधार

By Admin | Updated: August 12, 2015 00:13 IST2015-08-12T00:13:42+5:302015-08-12T00:13:42+5:30

'माझ्या वडिलाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि आम्ही उघड्यावर आलो. अनेकांनी मदतीचा हात दिला.

The patriarch gave the lost dhok family to support | पितृछत्र हरविलेल्या ढोक कुटुंबाला दिला आधार

पितृछत्र हरविलेल्या ढोक कुटुंबाला दिला आधार

मुलींची व्यथा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार
वरुड : ''माझ्या वडिलाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि आम्ही उघड्यावर आलो. अनेकांनी मदतीचा हात दिला. आम्हाला घर नसते तरी चालले असते मात्र आज आमचे वडील राहिले असते तर आमच्यावर मायेचा हात राहिला असता, परंतु आज माझे बाबा नसल्याचे दु:ख आहे. अनेक आलेत, शब्दाने सांत्वना करुन निघून गेलेत. असे वाटले की सर्व शब्दांचा खेळ असतो. बोलण्यापुरते सर्वच असतात. परंतु बाबा गेल्यावर सख्ख्या भावाप्रमाणे खा.राजू शेट्टे साहेब समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या कृतीतून आम्हा भावंडांना आशेचा किरण मिळाला.'' असे म्हणत मृत शेतकऱ्याची मुलगी श्वेता हिला अश्रू आवरता आले नाही. यावेळी संपूर्ण सभामंडपातील उपस्थितांच्या डोळयात अश्रू तरळले होते.
केवळ कर्जामुळे माझे वडील शिवहरी ढोक यांनी जीवनयात्रा संपविली. घरात वंशाचा दिवा नसताना पत्नी रमाबाई आणि तीन मुली डिंपल, श्वेता आणि संपदा एवढाच परिवार होता. वडील गेल्याने ढोक परिवार उघड्यावर आला. उरले ेहोते ते केवळ आईचे प्रेम. आईने काय करावे हा प्रश्न होता. शिक्षण शिकवावे की, विवाहाची तडजोड करावी. यामुळे संपूर्ण ढोक परिवार चिंताग्रस्त झाला होता. आम्हाला आज त्यांचा आधार मिळाला नसता तर आम्हीसुध्दा संपलो असतो, अशा शब्दात हुंदके देत ती रडत होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर राजकारण करणारे अनेक येऊन गेले. आप्त, स्वकीय आलेत, राजकारणी आणि आप्तेष्टांनी केवळ शाब्दिक धीर देण्यापलीकडे काहीच केले नाही तर आमदार, खासदारांनी आश्वासनांची लाखोली वाहिली. आम्ही ‘आज मिळेल, उद्या मिळेल’ या आशेने जगत होतो. एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना कळली आणि ते सरळ खानापूरच्या दिशेने निघाले. यावेळी आम्हाला आमच्या अडचणी विचारल्या. तेव्हा मी सांगितले कर्जापायी आमचा बाप गेला. तो मिळणार नाही, घर मिळेल, शिक्षणाचा खर्चही मिळेल आणि खायला अन्नसुध्दा मिळले. परंतु माझे ेवडील परत येणार नाही, असे हुंदके देत देत सांगत असताना खा. शेट्टी, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर आणि देवेंद्र भुयार यांच्या रुपाने भावाची माया मिळाली. तेव्हा केवळ आम्हाला शौचालय आणि स्नानगृह द्या, असे सांगितले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी खा.शेट्टी यांनी आम्ही पूर्ण घर बांधून देतो, असे सांगितले आणि तेव्हापासूनच घराची मुहूर्तमेढ रोवली. कुणाचा यावर विश्वास बसत नव्हता. मात्र इतरांप्रमाणे हे आश्वासन देऊन निघून न जाता दुसऱ्याच दिवशी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घर बांधण्यास सुरुवात केली. आज शहीद क्रांतिदिनी ते घर मिळाले. याचा आनंद असला तरी मात्र आमचे वडील राहिले नाही, हे दु:ख कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच प्रार्थना आहे. यामुळे शेतकऱ्यांवर कितीही संकट आले तरी कुणी आत्महत्या करुन जीव गमावू नका आणि आपला संसार उघड्यावर आणू नका, असे आवाहन तिने केले. यावेळी संपूर्ण सभामंडप नि:शब्द होऊन अश्रू ढाळत होता. (तालुका प्रतिनीधी )

Web Title: The patriarch gave the lost dhok family to support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.