वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची तारांबळ

By Admin | Updated: March 6, 2015 00:47 IST2015-03-06T00:47:43+5:302015-03-06T00:47:43+5:30

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून अन्य अधिकारी रजेवर असल्याने या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे.

Patients suffering due to medical officers | वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची तारांबळ

वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची तारांबळ

आसेगाव पूर्णा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून अन्य अधिकारी रजेवर असल्याने या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे. परिसरातील रूग्णांना त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
परिसरातील रूग्णांची तारांबळ लक्षात घेता या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रहारचे कार्यकर्ते अजय तायडे व चांदूरबाजार पंचायत समितीच्या माजी सभापती माया तायडे यांनी केली आहे. परिसराची लोकसंख्या तीस हजारांच्या आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या या आरोग्य केंद्राचा लाभ आसेगाव परिसरातील नागरिकही घेतात. आसपास कुठे रस्ता अपघात झाला तर जखमींना प्रथमोपचारासाठी येथे आणले जाते. आतापर्यंत या आरोग्य केंद्राचा कारभार दोन वैद्यकीय अधिकारी पाहत होते, हे विशेष.
पण, काही दिवसांपूर्वी येथीलच एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरुन त्यांची येथून इतरत्र बदली करण्यात आली आहे. येथील दुसरे वैद्यकीय अधिकारी काही दिवसांपासून रजेवर असून त्यांची येथे पुन्हा रुजू होण्याची मानसिकता नसल्याचे दिसते. या आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने या केंद्राचा प्रभार नजीकच्या हिरुर आणि राजना उपकेंद्रातील डॉक्टरांकडे सोपविण्यात आला आहे. परंतु एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सेवा देताना या प्रभारी डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी आसेगावच्या आरोग्य केंद्राकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
डॉक्टरांच्या गैरहजेरीत कित्येकदा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे काही कर्मचारी रुग्णांची थातुरमातूर तपासणी करुन टाईमपास करताना आढळतात. डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात नसल्याने रुग्णांचे समाधान होत नाही. त्यामुळे कित्येक गोरगरीब ऐपत नसतानाही खासगी डॉक्टरांकडून इलाज करुन घेणे अधिक पसंत करतात. तसेच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कोणतीही कारणे दाखवून जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविले जाते. शासन या केंद्रांवर लाखो रुपयांचा खर्च करीत असूनही रुग्णांची गैरसोय होत असल्याची खंत वाटते.
या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याने येथे तपासणीसाठी येणाऱ्या बाह्यरुग्णांची व प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या रोडावत चालली आहे. शासनाच्या आरोग्य विषयक धोरणावरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या ताप, सर्दी, खोकल्याची साथ असल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता भासत आहे. येथे दोन वद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

Web Title: Patients suffering due to medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.