अमरावती -मुंबई एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत प्रवासी; रेल्वेचे ट्रॅफिक वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:23+5:302021-06-28T04:10:23+5:30

बडनेरा : कोरोना संसर्ग ओसरताच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती ...

Passengers waiting for Amravati-Mumbai Express; Railway traffic increased! | अमरावती -मुंबई एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत प्रवासी; रेल्वेचे ट्रॅफिक वाढले!

अमरावती -मुंबई एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत प्रवासी; रेल्वेचे ट्रॅफिक वाढले!

बडनेरा : कोरोना संसर्ग ओसरताच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती मुंबई एक्स्प्रेसची डिमांड आहे. प्रवासीवर्ग तिच्या प्रतीक्षेत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आता सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागलेली आहे.

कोरोना काळात अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्याच महत्त्वाच्या रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. दुसरी लाट कमी होताच हळूहळू बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. बडनेरा रेल्वे स्थानकाहून सद्यस्थितीत ६५ रेल्वे गाड्या विविध मार्गाकडे धावत आहेत. रेल्वे प्रवाशांची संख्यादेखील आधीच्या प्रमाणात अधिकपटीने वाढली आहे. कोरोनाकाळात रिकाम्या धावणाऱ्या गाड्या आता बऱ्यापैकी प्रवासी क्षमतेने धावत आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अमरावती -मुंबई गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी वर्ग लागला आहे. बंद असणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने प्रवास करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. विदर्भातील लोक मोठ्या संख्येत मुंबई-पुण्याकडे कामकाजासाठी जातात. सुरक्षित व परवडणारा हा प्रवास असल्याने बहुतांश लोक रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळेच अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागलेली आहे.

------------------

बॉक्स

पॅसेंजर गाड्या केव्हा येणार पटरीवर?

जवळपासच्या ५० किलोमीटर अंतरावरील रेल्वे स्थानकाशी जुळून असणाऱ्या गावखेड्यांवरील प्रवाशांसाठी त्यांच्या कार्यालयीन, शेती संबंधातील, इतर दैनंदिन कामकाजासाठी शहरात येण्यासाठी पॅसेंजर रेल्वे गाड्या सोयीच्या व परवडणाऱ्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करा, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे. या मागणीचा रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने विचार करावा. लोकप्रतिनिधींकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील सांगण्यात आले. मात्र, गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे घोडे कुठे अडले, हेच समजू शकलेले नाही. इतर गाड्यांप्रमाणेच पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत. कोरोना संसर्गाचे नियम पाळून आम्ही प्रवास करू, अशा प्रतिक्रिया आहेत.

------------------

* प्रवासी काय म्हणतात? *

प्रतिक्रिया-

कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. बंद असलेल्या रेल्वेगाड्या पूर्ववत केल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढती आहे. मात्र, काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या अद्यापही बंद आहेत. त्यादेखील सुरू केल्यास प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरेल.

- अमित कदम,

प्रवासी

--------------------

प्रतिक्रिया-

दीड वर्षापासून बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या पाहिजे. या गाड्यांचा मोठा प्रवासीवर्ग आहे. गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी त्याचे भाडेदेखील परवडण्याजोगे आहे. पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

- आनंद नाईक,

प्रवासी

--------–------------

* या गाड्या कधी सुरू होणार *

1) अमरावती - मुंबई एक्स्प्रेस

2) अमरावती- पुणे सुपरफास्ट

3) अमरावती- जबलपूर

4) अमरावती -सुरत

5) सर्वच पॅसेंजर रेल्वे गाड्या

--------------------

* सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या*

1) महाराष्ट्र एक्स्प्रेस

2) विदर्भ एक्स्प्रेस

3) गीतांजली एक्स्प्रेस

4) हावडा मुंबई मेल

5) नवजीवन एक्स्प्रेस

6) कुर्ला -हटिया

7) अमरावती- तिरुपती एक्सप्रेस

8) हावडा -अहमदाबाद

-----------------------

Web Title: Passengers waiting for Amravati-Mumbai Express; Railway traffic increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.