संत्रा झाडावरच; तोडण्याची मुदत संपली; उत्पादकांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:31 PM2021-02-26T13:31:49+5:302021-02-26T13:32:17+5:30
Amravati News वरूड तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्राबागांचा व्यापाऱ्यांशी करार करून इसार घेतला. आता तोडणीची मुदतदेखील संपली, परंतु पाऊस व गारपिटीने संत्री झाडावरच राहिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वरूड तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्राबागांचा व्यापाऱ्यांशी करार करून इसार घेतला. आता तोडणीची मुदतदेखील संपली, परंतु पाऊस व गारपिटीने संत्री झाडावरच राहिली. निसर्गाच्या बेभरवशामुळे संत्राउत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.
तालुक्यात २० हजार हेक्टरवर संत्राबागा आहेत. त्यावर कुणी आंबिया, तर कुणी मृग बहराचे उत्पादन घेतो. यावर्षी मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी आले. संत्री तोडणीची वेळ होताच व्यापाऱ्यांशी करार-मदार झाले. कुणी टनाचा, तर कुणी क्रेटचा दर घेतला. टोकन म्हणून इसार घेऊन तोडणीची मुदत देण्यात आली. दरम्यान, पाऊस व तुरळक गारपीट झाली. हवेमुळे काही ठिकाणी संत्री जमिनीवर आली. हीच संधी पाहून व्यापाऱ्यांनी मुदत संपूनही तोडणी केलेली नाही. यातच दिवसाआड मेघ दाटून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा पाचवीला पुजला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत झोप नाही. पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या संत्राबागांमध्ये फळे पाहून स्वप्न रंगविणारा शेतकरी ती तोडली जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३८ ते ४० हजार रुपये टन व क्रेटला ७०० ते ८०० रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.