दस्ताची फेरफार नोंद होणार 'आॅनलाईन'
By Admin | Updated: May 22, 2014 23:26 IST2014-05-22T23:26:32+5:302014-05-22T23:26:32+5:30
राज्याच्या महसूल विभागाने दस्त नोंदणी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. या माध्यमातून यापुढे हस्तलिखीत पध्दती ऐवजी ई-फेरफार पध्दतीने जलद गतीने कामकाज होणार आहे.

दस्ताची फेरफार नोंद होणार 'आॅनलाईन'
शासन निर्णय : नोंदणीची ई-फेरफार विकसित होणार
अमरावती : राज्याच्या महसूल विभागाने दस्त नोंदणी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. या माध्यमातून यापुढे हस्तलिखीत पध्दती ऐवजी ई-फेरफार पध्दतीने जलद गतीने कामकाज होणार आहे. या दृष्टिने नोंदणीबरोबरच फेरफार नोंदीची कार्यवाही करण्यासाठी नियमात सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. नोंदणीकृत दस्तऐवजांचा फेरफार नोंदीच्या वेळी पत्करायला परत एकदा तलाठ्यासमोर उपलब्ध राहण्याची आवश्यकता नाही. अशा स्वरुपाच्या सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूलअधिकार अभिलेख आणि नोंद वह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे, नियम १९७१ मध्ये करण्यात येणार आहे. राज्यामध्ये दस्तनोंदणी प्रक्रियेचे संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. नोंदणीकृत दस्ताऐवजाने होणार्या फेरफार नोंदी घेतल्यानंतर दुय्यम निबंधकासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून दस्ताऐवजावर सही करणार्या पक्षकाराला परत एकदा संबंधित तलाठ्यासमोर उपस्थती राहण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे विलंब टाळून अधिकार अभिलेख वेळीच अद्यावत होतील व त्यामध्ये पारदर्शकता येईल. दस्तनोंदणी होताच त्याची माहिती आज्ञावलीद्वारा तहसील कार्यालयातील म्युटेशन सेलला तत्काळ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्या आधारे फेरफार नोंद घेऊन नमुना ९ ची नोटीस तयार करुन तलाठ्यास तशी नोंद घेण्याचा एसएमएस किंवा ई-मेल केला जाणार आहे. त्यानुसार तलाठी किंवा परीक्षण भूमापक (सर्व्हेअर) फेरफार नोंदवहीत नोंद घेऊन पुढील कार्यवाही करणार आहेत. ही सगळी कार्यवाही तात्काळ आॅनलाईन होवून नागरीकांची होणारी गैरसोय आणि विलंब टाळता जाऊ शकेल तसेच हे सर्व अभीलेख वेळोवेळी अद्यावत राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना लाभ होणार आहे. (प्रतिनिधी)