कांद्याची साठेबाजी!

By Admin | Updated: July 23, 2015 00:17 IST2015-07-23T00:17:03+5:302015-07-23T00:17:03+5:30

बाजारपेठेत अचानक कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा गेला कोठे? हा संशोधनाचा विषय ठरु लागला आहे.

Onion stockpile! | कांद्याची साठेबाजी!

कांद्याची साठेबाजी!

प्रतिकिलो ४० रुपये : व्यापाऱ्यांना आले सुगीचे दिवस
अमरावती : बाजारपेठेत अचानक कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा गेला कोठे? हा संशोधनाचा विषय ठरु लागला आहे. काही दिवसांपूर्वी १५ ते १७ रुपये प्रतिकिलो रुपये दराने विकला जाणारा कांदा आता ४० रुपयांवर पोहचल्याने ग्राहक चक्रावून गेले आहेत. ही परिस्थिती कांद्याच्या साठेबाजीमुळे निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी आर्थिक लुबाडणूक चालविल्याचे चित्र आहे.
एप्रिल, मे महिन्यात कांद्याचे उत्पादन आल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारपेठेत प्रतिकिलो आठ ते १० रुपये या दराने भाव मिळाला. कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला कांदा बघताच बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर घसरवून शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात तो खरेदी केला. ही प्रक्रिया महिनाभर सुरु राहिली तेंव्हा कांदा उत्पादकांना भाव मिळाले नाही. बाजारात कांद्याला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कांदा साठवण करण्यासाठी पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला. महिन्या दिड महिन्यात शेतकऱ्यांकडील कांदा संपताच व्यापाऱ्यांनी ही बाब हेरुन कांद्याचे भाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात जूनमध्ये २५ रुपये किलो तर जुलै महिना उजाळताच कांदा ४० रुपये किलो दरावर पोहचला आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी बाजारात कांद्याची आवक नगण्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले असताना कांदा गेला कोठे? हे शोधून काढणे प्रशासनापुढे आव्हान ठरणारे आहे. सलग तीन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पेरा कमी केल्याची माहिती आहे.
यंदा थोडेफार कांद्याचे उत्पादन कमी झाले असले तरी प्रारंभी कांद्याला भाव कमी का मिळाले, हे देखील महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतिचा कांदा साठवणूक तर निकृष्ट दर्जाचा कांदा बाजारपेठेत विकून सामान्य ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. विशेषत: बडनेरा व अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक केल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यानुसार बाजारपेठेत शेतकऱ्यांनी कांदा विकला. प्रतिकिलो ८ ते १० रुपये दराने शेतकऱ्यांना भाव मिळाला. आता अचानक कांदा ४० रुपये प्रतिकिलो दरावर पोहचल्याने सामान्य नागरिकांचे ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत, असे म्हणण्याची वेळ कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांनी आणली आहे, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)

आता कर्नाटकच्या कांद्याची प्रतीक्षा
जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी साठवूण ठेवल्याने पुढील पाच महिन्यापर्यंत नवीन कांदा बाजारपेठेत येईपर्यंत चढ्या दरात खरेदी केल्याशिवाय गत्यतंर नाही, असे एका विक्रेत्याने सांगितले. साठेबाजी करणारे मासे गब्बर असून त्यांच्यापर्यंत प्रशासनाला पोहचणे शक्य नाही. त्यामुळे कांदा थोडेफार स्वस्त दरात खरेदी करायचा असेल तर ग्राहकांना कर्नाटक येथून येणाऱ्या कांदावर अवलंबून राहावे लागेल, हे वास्तव आहे.
१०० रुपयांवर पोहोचेल कांदा
नाशिक, कर्नाटक येथे उत्पादित होणारा कांदा विदर्भात येण्यास दोन ते तीन महिन्याचा अवधी लागेल. त्यामळे हल्ली ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा कांदा पुढे १०० रुपये दराने विकला गेल्यास आश्चर्य वाटू नये. पुरवठा कमी, मागणी जास्त वाढल्याने येत्या काळात कांदा हा राजकीय पुढाऱ्यासह सामान्यांना रडवणार, असे संकेत आहेत.

कांद्याची साठेबाजी करण्याऱ्यांचा शोध घेवून कठोर कारवाई केली जाईल. सामान्यांची फसवणूक होऊ देणार नाही. यासंदर्भात बाजार समिती सचिवांची बैठक घेवून उपाययोजना केल्या जातील. साठेबाजी रोखण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र राबविले जाईल.
किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती.

उत्पादन घटले- कावरे
सलग तीन वर्षांपासून कांद्याला भाव नाही. त्यामुळे पेरा कमी झाला. उत्पादनात ७५ टक्के घट झाली आहे. शेतकरी साठवणूक करु शकत नाही. परिणामी मिळेल त्या दरात कांदा विकावा लागला, असे दर्यापूर तालुक्यातील टाकरखेडा (कावरे) येथील शेतकरी सतीश कावरे म्हणाले.

साठेबाजांना शोधून काढा- माळोदे
सुरुवातीला कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये भाव मिळाला. कांदा हे नासाडी पिक असल्याने शेतकरी साठवू शकत नाही. योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादनात घट झाली, हे वास्तव असल्याचे गुरुकुंज मोझरी येथील कांदा उत्पादक प्रवीण माळोदे यांनी सांगितले.

Web Title: Onion stockpile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.