जिल्ह्यातील सव्वाशे हेक्टर जमीन सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST2021-06-27T04:10:10+5:302021-06-27T04:10:10+5:30
अमरावती : ऊर्ध्व वर्धा धरणातील शिल्लक कोट्यातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ...

जिल्ह्यातील सव्वाशे हेक्टर जमीन सिंचनाखाली
अमरावती : ऊर्ध्व वर्धा धरणातील शिल्लक कोट्यातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्याने जिल्ह्यातील सव्वाशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
ऊर्ध्व वर्धा धरणातील कोटा शिल्लक असूनही सव्वाशे हेक्टर जमिनीवरील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पाणी तत्काळ शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी दिले. त्यामुळे १२५ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातील वर्धा जिल्ह्यासाठी पाणीसाठा शिल्लक ठेवला आहे .परंतु वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी येत नव्हती. त्यामुळे पाण्याचा कोटा शिल्लक राहत आहे. दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील १२५ हेक्टर जमिनीवर सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. या बाबत शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री कडू यांच्याकडे दाद मागितली. त्यानुसार राज्यमंत्र्यांनी ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी उपसा करू देण्याची परवानगी देण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले आहे.