२०० दिवसांमध्ये उकळली एक कोटींची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:18+5:302021-07-27T04:13:18+5:30
कॉमन प्रदीप भाकरे अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ ...

२०० दिवसांमध्ये उकळली एक कोटींची लाच
कॉमन
प्रदीप भाकरे
अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कालावधीत ४३५ ट्रॅप यशस्वी केले. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅपपध्ये तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
यावर्षी झालेल्या ४३५ ट्रॅपमध्ये ६०० जणांना अटक करण्यात आली, तर गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे. यंदाच्या पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली. यात वर्ग १ चे ४०, वर्ग २ चे ५६, वर्ग ३ चे ३४४, वर्ग ४ चे २९, ६३ खासगी लोक व ६८ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या ६०० जणांना तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच घेताना वा मागणी सिद्ध झाल्याने अटक करण्यात आली. यात वर्ग १ च्या लाचखोरांनी २८ लाख ४९ हजार लाच उकळली. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांनी १५ लाख ८५ हजार २०० रुपये, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांनी ५३ लाख ९१ हजार ७५० रुये, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी ४ लाख ४ हजार, अन्य लोकसेवकांनी ३ लाख २६ हजार ९०० रुपये, तर खासगी व्यक्तींनी ४ लाख १२ हजार ८०० रुपये लाच म्हणून घेतल्याची नोंद एसीबीने घेतली आहे.
बॉक्स
मार्चमध्ये सर्वाधिक ट्रॅप
यंदाच्या जानेवारीत एसीबीने ६२ ट्रॅप यशस्वी करीत ८७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. फेब्रुवारीत ६६ ट्रॅपमध्ये ८५, मार्चमध्ये ८८ ट्रॅपमध्ये ११९, एप्रिलमध्ये ४९ ट्रॅपमध्ये ६६, मेमध्ये ४७ मध्ये ७४, जूनमध्ये ७७ सापळ्यात १०३ तर, जुलैच्या १९ तारखेपर्यंत ४६ ट्रॅपमध्ये ६६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.