मतदानासाठी १७ पैकी एक पुरावा ग्राह्य
By Admin | Updated: October 20, 2015 00:16 IST2015-10-20T00:16:22+5:302015-10-20T00:16:22+5:30
नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा, यासाठी मतदार ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे.

मतदानासाठी १७ पैकी एक पुरावा ग्राह्य
नगरपंचायत निवडणूक : मतदार ओळखपत्र नसल्यास चिंता नको
अमरावती : नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा, यासाठी मतदार ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. मात्र, हे ओळखपत्र जवळ नसल्यास मतदाराला घाबरण्याचे कारण नाही. आयोगाने जाहीर केलेल्या १७ पुराव्यांपैकी एक पुरावा असल्यास तो मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे छायाचित्रांकित ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांचा फोटो असलेले पासबुक, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्ती यांची छायाचित्रासह असलेले प्रमाणपत्र, वयस्क वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेली शिधापत्रिका (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल) तसेच आधार ओळखपत्राचा समावेश आहे. यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि मतदारांची डोकेदुखी कमी होईल.
हे पुरावे धरणार ग्राह्य
पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे फोटोसहित ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँका व डाक कार्यालयातील खातेदारांचे फोटो असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असणारे ओळखपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या आधीच्या दिनांकापर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग इत्यादींना फोटोसहित दिलेले प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, नोंदणी खत आदी पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.