आता पावसाची नोंद होणार अपडेट
By Admin | Updated: June 4, 2015 00:15 IST2015-06-04T00:15:18+5:302015-06-04T00:15:18+5:30
एरवी पावसाळ्यातच पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. मात्र, आता नियमित वर्षभर पर्जन्यमान नोंदविले जाणार आहे.

आता पावसाची नोंद होणार अपडेट
९ जूनपासून वेबसाईटवर माहिती : मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी
जितेंद्र दखने अमरावती
एरवी पावसाळ्यातच पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. मात्र, आता नियमित वर्षभर पर्जन्यमान नोंदविले जाणार आहे. याची जबाबदारी प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी ६.३० वाजता ही नोंद व्हायलाच हवी, असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व ठिकाणचा पाऊस ९ जूनपासून निर्धारित संकेतस्थळांवर पहायला मिळणार आहे.
सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयातून सकाळी ८ वाजेपर्यंतची पावसाची आकडेवारी संकलित करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविली जाते. त्यानंतर तो डेटा शासनाकडे पाठविला जातो. परंतु आता ही माहिती शासकीय संकेतस्थळांकडे पाठविण्यासाठी पुणे येथील एनआयटी कार्यालयाकडे द्यावी लागेल. तेथून शासनाच्या संकेतस्थळावर प्रत्येक मंडळाच्या कार्यक्षेत्रानुसार ही माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. ही माहिती एसएमएसच्या माध्यमातून दिली जाईल. फक्त पावसाळ्यासाठी ही यंत्रणा नसून वर्षभर पावसाची प्रत्येक दिवसाची नोंद ठेवली जाणार आहे, हे विशेष.
यांच्यावर जबाबदारी
प्रत्येक तहसीलचे तहसीलदार , मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर जबाबदार मंडळ म्हणून काम सोपविले आहे.
पर्जन्यमानाची नोंद आधीपासूनच घेतली जाते. संकलित करून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाते. आता वेबसाईट साठीही नोंद घ्यावी लागणार आहे. यामुळे प्रत्येक गावात पर्जन्यमानाबद्दल माहिती मिळणार आहे. पारदर्शकतेसाठी हा उपक्रम चांगला आहे.
-विनोद अढाऊ ,
मंडळ अधिकारी, अंजनगाव सुर्जी