रमाई आवास योजनेसाठी आता केंद्राकडून निधी
By Admin | Updated: October 11, 2016 00:15 IST2016-10-11T00:15:26+5:302016-10-11T00:15:26+5:30
देशासह राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा सुधार करून त्यांना हक्काचे घर मिळावे, ...

रमाई आवास योजनेसाठी आता केंद्राकडून निधी
रामदास आठवले : विलासनगरात बुद्ध महोत्सवाचे थाटात उद्घाटन
अमरावती : देशासह राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा सुधार करून त्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी रमाई आवास योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गोर-गरीब कुटुंबास मिळावा व त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी दिली.
स्थानिक विलासनगरच्या विशाल प्रांगणात आयोजित बुध्द महोत्सव २०१६ निमित्त बुध्दगया येथील महाबोधी विहाराचा शिल्पकृती देखावा तयार करण्यात आला. याप्रसंगी ना. आठवले यांचे हस्ते भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीला हारार्पण करून महाबोधी विहाराच्या शिल्पकृतीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुध्द महोत्सवाचे आयोजक तथा नगरसेवक प्रदीप दंदे, रामेश्वर अभ्यंकर, प्रकाश बनसोड, भीमराव वाघमारे, महेंद्र भालेकर, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.
ना. आठवले म्हणाले की, जगातील विषमतेवर समतेचे विचार सांगून समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण भगवान गौतम बुध्दांनी दिली आहे. त्यांचे आदर्श व आचार-विचार आपल्यात रुजवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडितांच्या उध्दारासाठी संपूर्ण जीवन वाहून दिले. १४ आॅक्टोंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेऊन समस्त मानव जातीला एका आदर्श आचरणाची मुहर्तमेढ लावून दिली. आज त्या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त आज आपण सारेजण धम्मचक्र प्रर्वतनाचा हिरक महोत्सव बुध्द महोत्साच्या रुपाने साजरा करीत आहोत. राज्य शासन डॉ. आंबेडकर यांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करीत आहे. लंडन येथे वास्तव केलेल्या बाबासाहेबांचे घर सुमारे ४१ कोटी रुपये खर्चून शासनाने ताब्यात घेतले आहे. ज्याठिकाणी बाबासाहेब शिकले त्या कोलंबिया युनिर्व्हसिटी त्यांचे दाखले व अनुभव कथन सचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती ना. आठवले यांनी दिली. बुद्ध महोत्सव २०१६ निमित्त बुध्दगया येथील भगवान गौतम बुध्द यांची शिल्पकृतीचा देखावा तयार करण्यात आली. ही शिल्पकृती १२ दिवसांत तयार करण्यात आली असून यासाठी मंगेश ढेपे व पवन आसोपा या शिल्पकारांनी परीश्रम घेतले आहे, असे प्रास्ताविकात प्रदीप दंदे यांनी सांगितले.
मागेल त्याला घर, मागेल त्याला काम -पालकमंत्री
पालकमंत्री प्रविण पोटे आपल्या भाषणात म्हणाले की, आयोजक प्रदीप दंदे यांनी उत्कृष्ठ बुध्दगया ची शिल्पकृती तयार करुन जिल्हयातील जनतेला तथागत गौतम बुध्दांचे दर्शन घडविले आहे. राज्य शासनाव्दारे २०१५-२०१६ हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीवर्ष म्हणून साजरे करीत आहे. या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्मृती व भव्य स्मारक इंदू मिलच्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. आगामी काळात सन २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर, मागेल त्याला काम’ ही संकल्पना राबवून प्रत्येक गोर, गरीबास राहण्यासाठी घर व हाताकरीता काम देण्यात येणार आहे, असे पोटे यांनी सांगितले.